जी-20 कृषिमंत्र्यांच्या संमेलनात मोदींचे संबोधन :
वृत्तसंस्था / हैदराबाद
कृषीक्षेत्र जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरे जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी म्हटले आहे. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय बैठकीला त्यांनी संबोधित केले आहे. हवामान बदलामुळे कृषिक्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्लोबल साउथला बसला आहे. अशा स्थितीत जागतिक अन्नसुरक्षेवर विचारविनिमय केला जाणे आवश्यक असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.
जागतिक स्तरावर कृषी क्षेत्र 2.5 अब्जाहून अधिक लोकांना रोजगार प्रदान करते. ग्लोबल साउथमध्ये कृषीक्षेत्र जीडीपीच्या सुमारे 30 टक्के आणि 60 टक्क्यांहून अधिक रोजगाराचा स्रोत आहे. परंतु आता या क्षेत्राला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. भू-राजनयिक तणावांच्या प्रभावामुळे तसेच महामारीमुळे पुरवठासाखळीत अडथळे निर्माण झाल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
हवामान बदलामुळे वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. यासंबंधीची आव्हाने ग्लोबल साउथला अधिक प्रमाणात भेडसावत आहेत. भारताचे धोरण ‘बॅक टू बेसिक्स अँड मार्च टू फ्यूचर’चे मिश्रण आहे. देश नैसर्गिक शेतीसोबत तंत्रज्ञानयुक्त कृषीला चालना देत आहे. देशातील शेतकरी भूमातेच्या आरोग्याची काळजी घेत आता नैसर्गिक शेतीवर भर देत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
जी-20 देशांनी जागतिक अन्न सुरक्षेसाठी सामूहिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. हैदराबाद येथे जी-20 च्या कृषी कार्यगटाच्या अंतर्गत मंत्र्यांची 3 दिवसीय बैठक गुरुवारपासून सुरू झाली आहे. या बैठकीत सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या 200 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.
या बैठकीत कृषीक्षेत्रासंबंधी विचारविनिमय केला जात आहे. अन्नसुरŠा अन् पोषकतेबद्दल भारत पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. त्याचनुसार धोरणे तयार करण्यात आली असून त्यांची यशस्वी अंमलबजावणी निर्धारित करण्यात येत आहे. भारत कृषीक्षेत्रात अत्यंत समृद्ध अन् सशक्त आहे. स्वत:चे ज्ञान तसेच अनुभव जागतिक स्तरावर मांडण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मागील 9 वर्षांमध्ये भारतीय कृषीक्षेत्राने अनेक नवे टप्पे गाठले आहेत. हवामान बदल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून कृषी क्षेत्राच्या हिताकरता अनेक निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.