रेल्वेखाली जीव देऊन अनोळखीचा शिक्का : डीएनए चाचणीचा नवीन नियम, रेल्वेखाली जीवन संपविणाऱ्यांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
आत्महत्या करणे पाप आहे, असे महात्मा गांधीजींनी सांगितले आहे. कायद्यानेही आत्महत्या गुन्हा आहे. तरीही वेगवेगळ्या अडचणीत सापडलेले कमकुवत मनाचे लोक आत्महत्येचा मार्ग पत्करतात. रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांच्या वाट्याला तर उपेक्षाच येते. दोन वर्षांत रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या 17 जणांची अद्याप ओळखही पटलेली नाही.
2022 च्या डिसेंबरअखेरपर्यंत रेल्वेखाली वर्षभरात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 च्या तुलनेत ही संख्या 8 ने अधिक आहे. 2021 मध्ये रेल्वेखाली 52 जणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांत 17 जणांची ओळख पटली नाही. रेल्वे पोलिसांनीच सरकारतर्फे त्या अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. ते 17 जण कोण? ते कोठून आले? त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही का? केला तर या प्रयत्नांना यश आले नाही का? आदी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
लोंढापासून शेडबाळपर्यंत हद्द असलेल्या बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात रेल्वेखाली जीवन संपविणाऱ्यांची संख्या वाढती आहे. जर एखाद्या मृतदेहाची ओळख पटली नाही तर ती पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांना सातत्याने प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करूनही वेळेत ओळख पटली नाही तर शेवटी त्यांना मृताच्या नातेवाईकाची भूमिकाही बजावावी लागते.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2022 मध्ये रेल्वेखाली 60 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 31 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 21 जणांचा रेल्वेतून पडून किंवा आकस्मिक मृत्यू झाला आहे. 8 जण रेल्वेस्थानक परिसरात नैसर्गिकरित्या दगावले आहेत. 60 पैकी गेल्या वर्षभरात अद्याप 7 मृतदेहांची ओळख पटली नाही.
2021 मध्ये 52 जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाला होता. यावर्षीही 31 जणांनी आत्महत्या केली आहे. 7 जणांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला आहे तर 14 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. 10 मृतदेहांची दोन वर्षांनंतरही ओळख पटली नाही. नियमानुसार 2021 मधील 10 व 2022 मधील 7 अशा एकूण 17 मृतदेहांवर रेल्वे पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आहेत. तरीही त्यांच्या वारसदारांचा शोध घेण्याचे काम अद्याप जारी आहे.
एखाद्या अनोळखीचा रेल्वेखाली मृत्यू झाला किंवा त्याने आत्महत्या केली तर स्थानिक वृत्तपत्रात त्याची माहिती प्रसिद्ध करून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. किमान आठवडाभर परिसरात चौकशी केली जाते. वेगवेगळ्या पोलीस स्थानकांना माहिती पाठवून ‘तुमच्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात कोणी बेपत्ता झाले आहे का?’ याची माहिती मिळविण्यात येते. मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तरी मृताचे कपडे व त्याच्याशी संबंधित इतर वस्तू पोलीस जतन करून ठेवतात.
जर कुटुंबीय पोलीस स्थानकात आले तर कपडे व त्याच्याजवळ मिळालेल्या वस्तूंवरून ओळख पटविण्यात येते. सर्वतऱ्हेने प्रयत्न करूनही दोन वर्षांत अद्याप 17 जणांची ओळख पटली नाही. अनेक मृतदेह चेहरे ओळखण्याच्या स्थितीतही नसतात. रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे मृतदेह छिन्नविच्छिन्न झालेले असतात. अशावेळी अंगावरील कपडे किंवा घटनास्थळावर आढळलेल्या एखाद्या वस्तूवरून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
एक ते दीड वर्ष ओळख पटविण्यासाठी प्रयत्न
तब्बल एक ते दीड वर्षे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध करण्यापासून रेल्वेस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी मृतांविषयीची भित्तीपत्रके चिकटविली जातात. या काळात ओळख पटली नाही तर तालुका दंडाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तसेच कागदपत्रांची पूर्तता करून ओळख पटविण्याचे प्रयत्न थांबविले जातात. त्यानंतर त्या मृतदेहासंबंधीचे कपडे व इतर वस्तूंचीही विल्हेवाट लावली जाते. चालू वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत रेल्वेखाली 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका मृतदेहाची ओळख पटली नाही.
डीएनए चाचणीचा अवलंब
पूर्वी केवळ अंगावरील कपडे व मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून मृतदेह ओळखण्याची पद्धत प्रचलित होती. आता अनोळखी मृतदेहाची डीएनए राखून ठेवले जात आहे. गेल्या सहा महिन्यात चार अनोळखी मृतदेहांचे डीएनए काढून ठेवण्यात आले आहेत. रेल्वेखाली मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रकरणात मृतदेहांची ओळख पटविणे कठीण जाते. त्यामुळे वैज्ञानिकरित्या ओळख पटविण्यासाठी डीएनएचा आधार घेतला जात आहे. यापुढे प्रत्येक अनोळखी मृतदेहाचा डीएनए काढून ठेवला जाणार आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.