नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पोल्ट्री फीडमध्ये वापरण्यासाठी तुटलेले तांदूळ, गहू आणि ज्वारी यासारखी धान्ये पुरविण्याचे आवाहन नॅशनल एग कोऑर्डिनेशन समितीने (एनईसीसी) केंद्र सरकारला केले आहे. देशांतर्गत बाजारात मका आणि सोया पेंडीच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि तीव्र टंचाई यामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी कमीतकमी दोन लाख टन धान्य पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोंबडी खाद्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने एका अंडय़ाचा उत्पादन खर्च गेल्या वर्षीच्या 4 रुपयांवरुन आता 4.75 ते 5 रुपये झाला आहे. मात्र, अंडय़ाच्या विक्रीचा दर 3.50 रुपये इतकाच आहे. त्यामुळे प्रत्येक अंडय़ामागे उत्पादकाला दीड ते पावणेदोन रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. असा तोटा सातत्याने सहन करणे शक्य नसल्याने हजारो शेतकऱयांनी अंडी उत्पादनाचा व्यवसाय बंद केला आहे. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन कोंबडी खाद्यासाठी मक्याला पर्याय ठरेल अशा स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अंडी उत्पादकांची संघटना नॅशनल एग कोऑर्डिनेशन समितीने केली आहे.
पोल्ट्री व्यवसाय सध्या विविध आव्हाने झेलत आहे. सध्या निर्माण झालेले खाद्यान्न टंचाईचे संकटही फार मोठे आहे. गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः गेल्या एका वर्षात विविध कारणांमुळे मक्मयाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामतः पोल्ट्री व्यावसायिकांवरील आर्थिक भार वाढल्याचा दावा ‘एनईसीसी’ने केला आहे.