टी-20 मधील विजयी घोडदौड वनडेतही कायम राखण्याची भारताची महत्त्वाकांक्षा
लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारतीय संघ यशाची हीच घोडदौड आजपासून यजमानांविरुद्ध खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेत देखील कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. उभय संघात 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 5.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
भारताने यापूर्वी टी-20 मालिकेत आक्रमक खेळावर भर दिला आणि याचा त्यांना उत्तम लाभ झाला. आता वनडे मालिकेतही तोच आक्रमक पवित्रा कायम राखण्याचा रोहितसेनेचा प्रयत्न असेल. 2019 मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना अनेक आमूलाग्र बदल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, या क्रिकेट प्रकारातील भारताविरुद्धची मालिका अधिक रोमांचक ठरल्यास आश्चर्याचे कारण नसेल. शिखर धवन आता फक्त वनडे क्रिकेट खेळत असून त्याने इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करणे अपेक्षित आहे. विंडीजविरुद्ध आगामी मालिकेत धवनकडे नेतृत्वाची धुराही असणार आहे.
यापूर्वी टी-20 मालिकेत विराट कोहलीला पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करणे भाग होते आणि त्यात त्याला पुन्हा एकदा अपयश आले. पण, त्या तुलनेत वनडे क्रिकेट मालिकेत खेळत असताना येथे त्याला अधिक वेळ घेता येईल. यापूर्वी रविवारी शेवटच्या टी-20 सामन्यात त्याने थोडीफार चमक दाखवली असून पुढील तीन वनडेत त्याला सूर मिळावा, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, बेडॉन कार्स, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, पेग ओव्हर्टन, मॅथ्यू पार्किन्सन, जो रुट, जेसॉन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली.
सामन्याची वेळ ः सायं. 5.30 वा.
स्टार खेळाडू परतल्याने इंग्लिश संघ मजबूत
3 सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्स, जो रुट व जॉनी बेअरस्टो या स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने इंग्लिश संघ येथे आणखी मजबूत असणार आहे. जो रुट आता टी-20 क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे, टी-20 मालिकेत त्याचा समावेश नव्हता. याशिवाय, स्टोक्स व बेअरस्टो यांना इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताला धूळ चारल्यानंतर विश्रांती देण्यात आली होती. दिग्गज खेळाडू जोस बटलरचा टी-20 संघात समावेश नव्हता. पण, त्याची बॅट फारशी तळपली नव्हती. आता ती कसर तो येथे वनडे मालिकेत भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
रोहित म्हणतो, विराटच्या बांधिलकीवर शंका घेऊ नका!
नॉटिंगहम ः भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या टी-20 संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱया ‘एक्स्पर्ट्स’चा सोमवारी जोरदार समाचार घेतला. ‘विराटचा अव्वल दर्जा कोणत्याही साशंकतेच्या पलीकडील आहे आणि भारतीय संघव्यवस्थापन नेहमी त्याच्या पाठीशीच उभे असेल’, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
नोव्हेंबर 2019 नंतर एकाही क्रिकेट प्रकारात शतक झळकावू न शकलेल्या विराट कोहलीवर सातत्याने टीका होत आली असून त्यातच विराटच्या गैरहजेरीत हुडाने जोरदार फलंदाजी साकारली असल्याने यामुळे विरोधाभास दिसून येत राहिला. त्यानंतर माजी विश्वचषक जेता कर्णधार कपिलदेव व माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन आदींनी आपली मते मांडली. त्या पार्श्वभूमीवर रोहित बोलत होता.
‘आम्ही बाहेरचा गोंधळ फारसा मनावर घेत नाही. त्यामुळे, यातून मार्ग काढणे आमच्यासाठी कठीण नाही. मात्र, विराटवर टीका करणारे असे ‘एक्स्पर्ट्स’ कोण आहेत आणि त्यांना ‘एक्सपर्ट्स’ का म्हटले जाते, असा प्रश्न मला पडला आहे’, असे रोहित पुढे तपशीलवार बोलताना म्हणाला.
‘फॉर्ममधील चढउतार प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीतील अविभाज्य घटक असतो. हे प्रत्येकाबाबत घडते. केवळ 1-2 मालिकांमध्ये खराब कामगिरी झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर मागील योगदानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे योग्य नाही’, याचाही रोहितने उल्लेख केला.
यापूर्वी, कपिलने खेळाडूंना केवळ त्यांच्या पतप्रतिष्ठेवर संघात स्थान देणे योग्य होणार नाही, त्यांनी फॉर्म दाखवणे जरुरीचे असते, असे म्हटले तर विराटने 3 महिने क्रिकेटपासून सक्तीचा ब्रेक घ्यावा, असे आग्रही मत मायकल वॉनने मांडले होते.
तूर्तास, विराटच्या खात्यावर 70 आंतरराष्ट्रीय शतके असून सर्वाधिक शतकांच्या निकषावर तो सचिन तेंडुलकर (100) व रिकी पाँटिंग (71) यांच्या पाठोपाठ तिसऱया स्थानी आहे. मात्र, मागील 3 वर्षात खेळलेल्या 65 सामन्यात तो एकही शतक झळकावू शकलेला नाही. मागील 10 डावात 52 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.
महान खेळाडू देखील बॅड पॅचमध्ये अडकले, पण, विराटचा बॅड पॅच त्याहूनही मोठा!
कोणताही महान खेळाडू असो, प्रत्येकाला खराब फॉर्ममधून मार्ग काढावाच लागतो. मग तो खेळाडू सचिन असेल, लारा किंवा रिकी पाँटिंग. पण, अन्य सर्व खेळाडूंच्या तुलनेत बॅडपॅचमधून बाहेर पडण्यासाठी विराटला अधिक झुंजावे लागते आहे, असे आकडेवारी सांगते.
सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर लारा, पाँटिंग, सचिन, कॅलिस यातील एकाही दिग्गज खेळाडूची कसोटीतील सरासरी सलग दोन वर्षे 30 पेक्षा कमी कधीच नव्हती. शिवाय, सलग दोन वर्षे एकही कसोटी शतक झळकावले नाही, असेही त्यांच्याबाबत घडले नाही. कोहली मात्र सलग 3 वर्षे एकही शतक झळकावू शकलेला नाही. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा अवघ्या 3 महिन्यांच्या उंबरठय़ावर असून विराटला लवकर सूर सापडणे भारतीय संघासाठी विशेष महत्त्वाचे असणार आहे.
दिग्गज फलंदाज / कारकिर्दीतील सर्वात खराब वर्ष / सरासरी / शतक-अर्धशतक / खराब फॉर्मनंतर पुढील वर्षातील सरासरी
ब्रायन लारा / 2006 / 41.61 / 3-2 / निवृत्त
रिकी पाँटिंग / 2011 / 31.92 / 0-4 / 42.86
सचिन तेंडुलकर / 2012 / 23.80 / 0-2 / 34.50
जॅक कॅलिस / 2013 / 25.75 / 1-2 / निवृत्त
विराट कोहली / 2020 / 19.33 / 0-1 / 28.21.