कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर दोन दिवस उलटूनही अंत्यसंस्कार नाहीत
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात प्रशासकीय यंत्रणेकडून विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे. अनेक मृतदेहांवर 40 ते 45 पेक्षा जास्त तास उलटून गेले, तरी अंत्यसंस्कार झाले नसल्याने संबंधितांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी याबाबत आवाज उठवला आहे. तर भाजप जिल्हा सरचिटणीस यांनी प्रशासनाने योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कुमार जाधव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांचे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून नकार देण्यात आला. मृतदेहावर ओरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र 24 तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची कार्यवाही झाली नसल्याने बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल होत ढीम्म कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान पाच ते सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणे बाकी असून त्यांचे नातेवाईक ओरोस येथे दोन दिवसांपासून वास्तव्य करून आहेत. अंत्यविधी होत नसल्याने आणि जनता कर्फ्यूमुळे त्यांचे हाल होत आहेत.
संदीप कदम यांच्यासह सुनील जाधव, सुभाष वरवडेकर, प्रमोद जाधव, प्रवीण जाधव, आशिष नाईक आदींनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱयांचे या प्रकरणी लक्ष वेधले. दरम्यान मृतदेहांवर तात्काळ अंत्यसंस्कार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. तर पालकमंत्र्यांनी पोलीस बंदोबस्तात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.
स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे
कोरोना संसर्गित मृतदेहावर शासकीय खर्चात अंत्यसंस्कार करण्यासाठी नवनगर विकास प्राधीकरण क्षेत्रातील स्मशानभूमी निश्चित करण्यात आली असून अंत्यविधीचा ठेकाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी अंत्यविधी करण्यास स्मशानभूमीपासून लगतच्या रहिवाशांनी हरकत घेतली आहे. त्यांचा विरोध असल्याने ठेकेदाराकडून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेण्यास नकार दिल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.
ग्रामस्थांची अखेर समजूत
दरम्यान तहसीलदार आणि पोलीस यांनी विरोध असलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करून यावर तोडगा काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घेऊन अंत्यविधी करण्याची मागणी असल्याचे स्पष्ट केले. ठेकेदाराकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे तहसीलदारांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांचा विरोध मावळला. त्यानंतर सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले. तीन वाजल्यापासूनच ओरोस पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत एकाही मृतदेहावर अंत्यसंस्कार झाला नसल्याचे सांगण्यात आले.
भाजपकडून दखल
दरम्यान भाजपनेही या प्रकरणात लक्ष घातला असून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील एकाचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यांचा मुलगा व मुलगी ओरोस येथे दोन दिवसांपासून थांबले आहेत. गुरुवारी सायंकाळी सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ठेकेदाराने हतबलता व्यक्त केली असल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. प्रशासनाने ठेका दिलेल्या ठेकेदाराने पुढील सोपस्कार करणे आवश्यक आहे. मात्र त्याला शक्य नसेल, तर प्रशासनाने योग्य तो मार्ग काढावा. निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.