प्रतिनिधी / अक्कलकोट
महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार न हालणारा, न डोलणारा, न बोलणारा, न चालणारा आणि फक्त हप्ते वसुल करणार असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अक्कलकोट येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ स्वामी समर्थांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, माजी सहकारमंत्री, आ. सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, लखीमपूर येथे झालेल्या शेतकर्यांच्या प्रकरणाबद्दल माजी लोकप्रतिनिधी निषेधार्थ आंदोलन करतात आणि आपल्या कारखान्याला तालुक्यातील शेतकर्यांनी घातलेल्या ऊसाचे बिल न देता शिवीगाळ करतात, ही खेदजनक बाब आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सत्ता आल्यास शिर्डीसारखे अक्कलकोट शहरही ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ बनवू, शहर व तालुक्याच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 166 कोटीचा आराखडा सादर केलेला होता. त्याला आमच्या सरकारने त्यावेळी तात्काळ मंजूरी दिली होती. त्यातील 20 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी दिलेले होते. त्याचे शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला. आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 50 कोटी रुपये देतो असे आश्वासन त्यावेळी दिलेलो होतो. परंतु या बिघाडी सरकारच्या कुटील कारस्थानामुळे राज्यातील जनतेने भाजपाला आशिर्वाद देवूनही आम्ही सत्तेपासून दूर राहिलो. या आघाडी सरकारला कायमस्वरुपी गाढण्यासाठी भाजपा पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिंनी सज्ज रहावे तरुण तडफदार युवा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लढवावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलताना म्हणाले, अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपालिकांना मोठा निधी मिळाला. शहर व तालुक्याच्या विकासासाठी 166 कोटीचा आराखडा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सादर केला. त्यांनी तात्काळ आराखडा मंजूर करुन 20 कोटी रुपये निधी दिले. बायपास चौक ते शिवपुरी कारंजा चौक ते एमएसईबी चौक, ए-वन चौकातील व्यापारी संकुलन, हन्नुर चौक सुशोभिकरण आदी कामांचे लोकार्पण व भूमीपुजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे आग्रह पक्षातील नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकार्यांचे होते. त्यानुसार आज कोनशिला अनावरण करण्यात आले.