टोकन असलेल्याना लस न देताच पिटाळले : नगरसेवकांपर्यंत तक्रारी गेल्यानंतर अविनाश कदम, धनंजय जांभळे यांनी प्रशासनावर ओढले ताशेरे
प्रतिनिधी / सातारा
येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रामध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. टोकन असलेल्या नागरिकांना लस न देताच पिटाळले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ही बाब नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले.मुख्याधिकारी अभिजित बापट यांना बोलवून त्यांच्यासमोर प्रकार मांडला.उद्या त्यांना लस देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पडदा पडला.
लसीचे महत्व पटू लागल्याने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पहाटे पासून नागरिक नंबर लावून बसत आहेत. लसीला वशिलेबाजी व इतर प्रकार होत असल्याचे सातत्याने जोरदार चर्चा सुरू असते. गुरुवारी सकाळी कस्तुरबा हॉस्पिटल येथे सकाळी 5 वाजता जाऊन कोव्हक्सीन साठी टोकन देण्यात आले. तब्बल 7 तास थांबलेल्या नागरिकांना दुपारी पावणे एक वाजता लस संपल्याचे सांगण्यात आले.
हातात टोकन असूनही वयोवृद्ध लोक हात हलवत परत आले. ही बाब नागरिकांनी नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम आणि भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांना नागरिकांना सांगताच ते लगेच लसीकरण केंद्रावर पोहोचले. तेथील आरोग्य कर्मचायांना चांगल्या शेलक्या शब्दात विचारणा केली. त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना बोलवून घेतले अन त्यांच्या ही हा प्रकार निदर्शनास आणून दिला.यामुळे लसीकरण केंद्रावर दुपारी वातावरण तणावपूर्ण बनले होते.मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी उद्या लस देण्याचे आश्वासन दिले तेव्हा वाद मिटला. यावेळी मीडियाशी बोलताना नगरसेवक अविनाश कदम म्हणाले, लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी सुरू आहे. अतिशय नियोजनशून्य कारभार असून सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जेष्ठ आणि महिलांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.