प्रतिनिधी / मिरज
कोरोना आणि प्रदीर्घ काळाच्या लॉकडाऊननंतर मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या विशेष रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस रविवारी चार जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. कोयना एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू होत असल्याने पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (गाडी क्र. 01030) ही रविवारी चार जुलै रोजी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी कोल्हापूर स्थानकावरून सुटेल. संध्याकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी मुंबई स्थानकावर पोहचेल. तर मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी कोल्हापूर-मुंबई (गाडी क्र. 01029) ही विशेष एक्सप्रेस सोमवारी 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुटून कोल्हापूर स्थानकावर रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल. केवळ तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच या रेल्वे गाडीतून प्रवास करत येणार आहे. प्रवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.