प्रा. सुहास कुलकर्णी यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत गुंफले दुसरे पुष्प
प्रतिनिधी / बेळगाव
750 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेली ज्ञानेश्वरी ही शाश्वत व चिरंतर आहे. सर्वसामान्यांच्या अंतःकरणातील देव ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून मांडला. यामुळेच शेकडो वर्षांनी आजही ज्ञानेश्वरीची गावोगावी पारायणे केली जातात. भगवत्गीतेचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. परंतु ज्ञानेश्वरी हे भगवत्गीतेचे परिपूर्ण भाषांतर आहे, असे प्रतिपादन प्रा. सुहास कुलकर्णी यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या 46 व्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना प्रा. सुहास कुलकर्णी यांनी ‘ज्ञानेश्वरीतील भक्तीमार्ग’ या विषयावर विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते, उपाध्यक्ष नेताजी जाधव, ऍड. आय. जी. मुचंडी उपस्थित होते.
त्याकाळी कर्मकांडाचे, व्रत-वैतल्यांचे प्रमाण वाढले होते. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या वाणीतून प्रयत्न केले. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन भक्तीचा मार्ग सांगितला. त्यामुळेच सावता माळी, नरहरी सोनार, संत गोरा कुंभार यासारखे अनेक जाती-धर्मांतील संत निर्माण झाले. ज्ञानेश्वरांनी त्याकाळी प्रस्थापितांचे विचार बाजूला सारून आध्यात्मिक लोकशाही घडविली, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
ज्ञानेश्वरांना कीर्तन हे सर्वात प्रिय होते. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानातून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीचा प्रत्येक अध्याय हा जीवनाचा मार्ग सांगतो. कठीणप्रसंगी समस्येतून वाट कशी काढावी याचा मार्ग ज्ञानेश्वरीतून मिळतो. यामुळे आजच्या काळातील ज्ञानेश्वरीला आध्यात्मिक महत्त्व असल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. वाचनालयाचे सदस्य ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षा सुनीता मोहिते यांनी स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरमंडळी उपस्थित होती.