तिसऱया लाटेचा धोका असतानाही खरेदीसाठी एकच झुंबड : खबरदारी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला होता. आता लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्यात आला आहे. तब्बल 52 दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा बाजारपेठ बहरत आहे. असे असले तरी नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नियमांचे पालन करत बाजारपेठेतील व्यवहार सुरू ठेवल्यास कोरोनावर निश्चितच मात करता येईल, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार दुकाने काही प्रमाणात उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. नागरिकांनी खरेदी करताना कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव ओसरत चालला असताना नागरिकांच्या बेपर्वाईमुळे तिसरी लाट येणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना थोपविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.
बेळगाव बाजारपेठेत म्हणजेच नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, झेंडा चौक, कांदा मार्केट, रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली येथे सातत्याने गर्दी असते. आता अनलॉक प्रक्रियेत सायंकाळी 5 पर्यंत मुभा देण्यात आल्याने पुन्हा दिवसभर गर्दी दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्याने सध्या धान्य साहित्याची बेगमी करून ठेवण्यात प्रत्येक जण गर्क आहे. त्यामुळेच सारेजण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. धान्य बाजारपेठेप्रमाणेच फळ बाजाराला बहर आला होता. सध्या बाजारपेठेत सर्वत्र कलिंगड, अननस, आंबे, केळी यांची आवक वाढलेली दिसत होते.
अनलॉक झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी बसण्यास सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱया लाटेमुळे पुन्हा बाजारपेठ बंद पडू नये याची दक्षताही घेणे तितकेच गरजेचे आहे. व्यापाऱयांनीही कोरोना नियमांचे पालन करून आपापले व्यवहार सुरू ठेवल्यास त्याचा सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल, यात शंका नाही.
क्लब रोडवर वाहतुकीची कोंडी
शहरामध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. क्लब रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या ठिकाणी रहदारी पोलीस नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तब्बल तासभर ही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.