प्रतिनिधी / इस्लामपूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक जयंत पाटील सध्या सामाजिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मंगळवारी मुंबईत जयंतराव यांच्या ‘सेवासदन’या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता प्रतीक पाटील यांनी सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सारथी’ संस्था ही मराठा समाजातील युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहे. मात्र या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात असे मत प्रतीक यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसुत्रीच्या आधारे सारथीने काम केल्यास मराठा समाजातील युवक युवतीच्या विकासासाठी मोठे काम होईल, असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनात त्यांनी दहा मुद्दे मांडून अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
१. सारथी तर्फे मराठा समाजातील युवक युवतींना IIT व IIM या जागतिक दर्जाच्या भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रशिक्षणाचे कोर्सेस आयोजित करावेत. त्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रबोधन करता येईल.
२. दहावी-बारावीच्या गुणांवर पुढील प्रवेश अवलंबून असल्याने दहावी बारावीतील गुण अधिक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठा समाजातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करावेत.
३. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांचे वर्ग सुरु करणे.
४. इतर व्यावसाईक कौशल्ये जसे की सुतारकाम, प्लंबर, इ. चे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे.
५. जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिकण्यासाठी मराठा समाजाच्या शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देणे.
६. मराठा समाजातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना विशेष प्रोत्साहनपर भत्ता सुरु करणे.
७. मराठा समाजातील उद्योगपतीचा एक सेतू उभारून व्यासायाभिमुक कौशल्ये विकसित होण्यासाठी केंद्र सुरु करणे.
८. मराठा समाजातील मुला मुलींसाठी पुणे, मुंबई व दिल्ली येथे होस्टेल्स उभारणे.
९. मराठा समाजातील भूमिहीन व अल्पभूधारक व्यक्तींच्या पाल्यांचा डाटा जमा करून ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकले जात नाहीयेत, याचे ट्रॅकिंग करणे, व शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या मुला मुलींना प्रवाहात आणणे.
१०. जीवनाच्या विविध क्षेत्रांत जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या व्यक्तींचे सारथी साठी सल्लागार मंडळ स्थापन करून वेळोवेळी नवीन धोरणे ठरवून अंमलात आणणे.