पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला, राज्य सरकारला निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी येथे शेतकऱयांच्या मृत्यूंचे प्रकरण उत्तर प्रदेश सरकार योग्य रित्या हाताळत नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने स्थितीदर्शक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पर्यायी तपास यंत्रणेकडून हा तपास केला जाता येईल का ते पहावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचे पुत्र आशिश यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या ताफ्यातील एक कार शेतकऱयांच्या जमावात घुसल्याने चार शेतकऱयांचा मृत्यू झाला होता. नंतरच्या हिंसाचारात कारचा एक चालक, भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. एका जनहीत याचिकेच्या माध्यमातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे.
हत्येचा गुन्हा नोंद
या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड विधान अनुच्छेद 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. हत्येच्या गुन्हय़ाच्या आरोपीला चौकशीसाठी येण्याची विनंती केली जाते का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. अशा गंभीर गुन्हय़ांमधील आरोपीसमवेत इतर अशा आरोपींशी होतो तसाच व्यवहार व्हावयास हवा. या प्रकरणातील आरोपींना विशेष सवलती देण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणाकडे सरकारने गंभीरपणे बघावे, अशी सूचना करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू प्रसिद्ध वकील हरिष साळवे यांनी मांडली. एका मृत शेतकऱयांला गोळी लागली आहे, असे सांगण्यात येत आहे. तथापि, शवविच्छेदनात गोळी लागल्याचा उल्लेख नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
आरोपी कोणीही असो…
हत्येच्या गुन्हय़ात सर्वसाधारणपणे आरोपींना अटक केली जाते. त्यांना चौकशीसाठी बोलाविले जात नाही, अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली. तर आरोपी कोणीही असो कायद्याला आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करावे लागणार आहे, असे न्या. सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. यावर हरिष साळवे यांनी शनिवारपर्यंत सर्व काही ठीक होईल, असे उत्तर दिले.
एका वृत्तावरही नाराजी
सरन्यायाधीश रमणा हे या प्रकरणातील बळींच्या नातेवाईकांना भेटावयास गेले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली, असे होऊ शकत नाही. मी तर न्यायालयातच आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित
आपला पुत्र आशिश याची प्रकृती चांगली नाही. त्यामुळे तो शुक्रवारी तपास यंत्रणेसमोर उपस्थित राहू शकला नाही. तो पूर्णतः निर्दोष आहे. तो तपासाला सहकार्य करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी केले आहे. शुक्रवारी पोलिसांनी आशिश याच्या निवासस्थानावर आणखी एक नोटीस चिकटविली असून त्याला शनिवारी 9 ऑक्टोबरला बोलाविण्यात आले आहे.
काँगेसचा आरोप
उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात जाणून बुजून चौकशी लांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँगेससह काही विरोधी पक्षांनी गुरुवारी केला होता. मंत्रीपुत्राला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या इशाऱयावर काम करीत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे चौकशी होणार नाही, असाही आरोप काही नेत्यांनी केला. भाजपच्या वतीने या आरोपांचा इन्कार करण्यात आला. विरोधी पक्ष शेतकऱयांच्या मृत्यूचे राजकारण करीत असून त्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशीही प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात आली.