संजय गायकवाड/सांगली
जिल्हा परिषदेच्या निवडणूकीला अजून बराचसा कालावधी असला तरी जिल्हा परिषदेच्या मिरज तालुक्यातील मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा विषय ऐरणीवर आला असून सध्याचे काही मतदारसंघ विकासकामे आणि लोकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याने मतदारसंघाच्या पुनर्रचनेची मागणी पुढे आली आहे. यात समडोळी या मतदारसंघाचे विभाजन करून पुर्वीप्रमाणेच हरिपूर तर बुधगांव मतदारसंघाचे विभाजन करून माधवनगर येथे जिल्हा परिषदेचे नवे मतदारसंघ निर्माण करणे शक्य असून तशी मागणी लोकप्रतिनिधी व जनतेतून आता जोर धरू लागली आहे.
महापालिकेची प्रभाग वा वार्ड रचना ही दर पाच वर्षानी केली जाते. जिल्हा परिषदेची मतदारसंघ रचना मात्र दर दहा वर्षानी केली जाते. लोकसंख्या वाढ आणि भौगोलिक सलगता हे दोन मुद्दे विचारात घेऊन मतदारसंघाची निर्मिती केली जाते. पण त्या त्या मतदारसंघातील लोकांची सोय हा सर्वात महत्वाचा निकष असायला हवा. असे अभिप्रेत आहे. पण तसे होत नाही. प्रशासनाच्यावतीने लोकसंख्या आणि भौगोलिक सलगता या दोन मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जातो. पण यातून नंतर गैरसोयी आणि विकासकामांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात मतदारांच्या संख्येत जर वाढ झाली तर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाकडून मतदारसंघाच्या पुर्नरचनेचा कार्यक्रम हाती घेतला जातो. पण सध्याचे विशेषतः मिरज तालुक्यातील काही मतदारसंघ लोकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत असल्याने या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा विषय ऐरणीवर आला आहे.
मिरज तालुक्यात भोसे, एरंडोली, आरग, मालगांव, कवलापूर, बुधगांव, कसबेडिग्रज, कवठेपिरान, समडोळी, म्हैसाळ व बेडग असे जिल्हा परिषदेचे 11 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात पंचायत समितीचे प्रत्येकी दोन मतदारसंघ आहेत. यापैकी हरिपूर येथे 2012 ला जिल्हा परिषदेचा मतदारसंघ होता त्यावेळी या मतदारसंघात हरिपूरसह अंकली, इनामधामणी ,जुनी धामणी, निलजी, बामणी, ढवळी, वड्डी, टाकळी व बोलवाड अशा दहा गावांचा समावेश होता. 2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या मतदारसंघ पुनर्रचनेत हरिपूर हा मतदारसंघ रद्द होवून समडोळी हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. यात समडोळीसह हरिपूर, अंकली, इनामधामणी, जुनी, धामणी, निलजी, बामणी, ढवळी अशा एकूण आठ गावांचा समावेश करण्यात आला. यात 2012 ला असलेली वड्डी, टाकळी व बोलवाड ही तीन गावे अन्य मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली.
पण सध्या हरिपूरकरांना समडोळी हा मतदारसंघ गैरसोयीचा ठरत आहे. हरिपूर आणि समडोळी या दोन्ही गावांच्या मध्ये कृष्णा नदी आहे. दोन्ही गावांच्या मधील अंतर 12 कि.मी. आहे. तर ढवळीसारख्या गावापासून समडोळीपर्यंतचे अंतर त्याही पेक्षा जास्त आहे. ही दोन्ही गावे खूपच लांब व एकाला टोकाला आहेत. जिल्हा परिषदेशी संबधित कामासंदर्भात हरिपूरच्या लोकांना समडोळीला जाणे आणि तिकडील सदस्यांना कामे सांगणे अडचणीचे होते. तिकडून कोण सदस्य निवडून आला आहे. याच्याशी हरिपूरकरांना काही देणेघेणे नाही. सोय महत्वाची आहे. असे हरिपूरवासियांचे म्हणणे आहे. त्यासाठी हरिपूरला स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात यावा. अशी मागणी होत आहे.
भौगोलिक सलगतेचा विचार केला तर हरिपूरसह अंकली, निलजी, बामणी, जुनी धामणी असा नवीन मतदारसंघ अस्तिवात येऊ शकतो. समडोळी आणि तिकडील काही गावे घेवून तो मतदारसंघ तसाच कायम ठेवता येऊ शकतो. याशिवाय वड्डी, ढवळी, इनामधामणी असाही एक नवीन मतदारसंघ तयार करणे शक्य आहे.
दुसरीकडे बुधगांव कवलापूर असा एक जिल्हा परिषदेचा पुर्वी मतदारसंघ होता. कालातंराने कवलापूर व बुधगांव या दोन्ही ठिकाणी जि.प.चे स्वतंत्र मतदारसंघ तयार झाले. यातील बुधगांव या एकाच गावासाठी पंचायत समितीचाही स्वतंत्र मतदारसंघ अस्तिवात आहे. बुधगांव, कवलापूर, माधवनगर, बिसूर या चार गावांच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कवलापूर, बुधगांवप्रमाणेच माधवनगरलाही जि.प.चा स्वतंत्र मतदारसंघ तयार करणे आवश्यक आहे. माधवनगरच्या नव्या मतदारसंघात माधवनगर, कर्नाळ अशी काही गावे घेता येणे शक्य आहे.
मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सध्याचे मतदारसंघ
जिल्हा परिषद…………..पंचायत समिती.
भोसे………………………..सोनी ,भोसे.
एरंडोली………………………..एरंडोली, सलगरे.
आरग………………………….खटाव, आरग.
मालगांव…………………..मल्लेवाडी, मालगांव.
कवलापूर……………………बामनोली, कवलापूर-बिसूर
बुधगांव………………………….माधवनगर, बुधगांव.
कसबेडिग्रज……………………..नांद्रे, कसबेडिग्रज.
कवठेपिरान………………………..दुधगांव, कवठेपिरान.
समडोळी…………………………..समडोळी-हरिपूर, इनामधामणी
म्हैसाळ……………………………….टाकळी, म्हैसाळ
बेडग……………………………बेडग ,नरवाड.
समडोळी हरिपूर तीन विधानसभा मतदारसंघाची किनार.
दरम्यान समडोळी, हरिपूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ सांगली, मिरज आणि वाळवा-इस्लामपूर अशा तीन विधानसभा मतदारसंघांत विभागलेला आहे. त्यामुळे समडोळी आणि हरिपूर असे जि.प. चे दोन नवे मतदारसंघ तयार करण्यात काहीच अडचण येणार नाही. महापालिकेच्या वार्ड रचनेला ज्याप्रमाणे मतदारांची संख्या कमी जास्त असते. त्याप्रमाणे जि.प.लाही कमी जास्त मतदारसंख्या गृहित धरून नवे मतदारासंघ तयार करता येणे शक्य आहे. शेवटी मतदारसंख्या ,भौगोलिक सलगता याबरोबरच लोकांची सोय हा मुद्दा महत्वाचा आहे. असे हरिपूरचे भाजपाचे नेते अरविंद तांबवेकर यांनी सांगितले.