उत्तरार्ध
आम्हाला मिळालेली मोठमोठी पदकं, मोमेंटो, करंडक आम्हाला सतत आमच्या घरात मिरवावेसे वाटतात. अनेक लोक त्यासाठी मोठमोठ्या शोकेससुद्धा करून घेतात. परंतु तुमच्या मागे या बक्षिसांचं काय करायचं असे प्रश्न घरातल्यांनाच पडतात किंवा नातवाला मिळालेलं बक्षीस कुठे ठेवायचं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपोआपच या मोमेंटोची रवानगी कचरा पेटीत व्हायला सुरुवात होते. हे सगळे सर्टिफिकेट्स, फाईल, मोमेंटो, बक्षिसं आम्ही भिंतीवर लावून किंवा शोकेसमध्ये ठेवून मिरवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आम्हाला स्वत:ला ते स्वत:च्या हाताने आवरून ठेवता आले पाहिजे. कारण आपल्या नंतर त्याचं महात्म्य पुढच्या पिढीला कोण सांगणार? म्हणूनच वृत्तीची निवृत्ती व्हायला हवी असं म्हटलं जातं. पुण्यातल्या अनेक जुन्या शाळांमध्ये शिक्षकांच्या कथा मी वाचल्या. त्यामध्ये अनेक मुख्याध्यापक हे शाळा सुटल्यानंतर शिक्षकांच्या घरी जाऊन विचारपूस करणारे, त्यांना मदत करणारे असे पाहिले की लक्षात येतं की शाळा संपल्यानंतर मुख्याध्यापकपदाचा विसर त्यांना पडत होता आणि म्हणूनच ते माणूस म्हणून जगू शकत होते. असं जगता येणं म्हणजेच कर्म संन्यासाचं चालतं बोलतं उदाहरण जगणं होय.
आपल्या शरीराचे जर उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल आपल्या अवयवांनासुद्धा निवृत्ती असते. ठराविक काळानंतर आमच्या डोळ्यांना मोतीबिंदू तयार व्हायला लागतो. कानांना ऐकू येईनासे होते. बोलताना जीभ अडखळायला लागते. भराभरा पडणारे पाय आता दुखायला लागलेले असतात. हाताच्या कामाची गती कमी झालेली असते. परंतु माणसं त्याच मोठेपणात त्याच पदांमध्ये इतके अडकून पडतात की आपण ह्यातून निवृत्त व्हायचं असतं, हेच ते जणू विसरून जातात. मग इथेच सगळा घोटाळा सुरू होतो. एखाद्या सासूला सतत वाटतं की माझंच कौतुक करावं. सुनेचं मोठेपण तिला मान्यच नसतं. एखाद्या मोठ्या पदावरच्या साहेबाला वाटतं की सतत माझ्या मागेपुढे माणसं झुलत राहावीत. एखाद्याला त्याच खुर्चीच्या किंवा पदाच्या नावाने ओळखलं जावं, असा त्याचा अट्टहास असतो. रावसाहेब, भाऊसाहेब म्हणावं असं वाटतं अन्यथा तो रागवतो, रुसतो. नाटकात शिवाजीचं काम करणारा घरी आल्यावर माँसाहेब आम्हास जेवण तयार ठेवा, असं म्हणतो…. तेव्हा जे सणसणीत उत्तर आईकडून मिळेल तसाच अनुभव इतरांनाही येतोच. त्या भूमिकेतून बाहेर पडता यायला हवे. ह्या ज्या मनाला लागलेल्या व्याधी आहेत किंवा वृत्ती आहेत या संपणे फार कठीण आहे. त्यासाठी वृत्तीची निवृत्ती व्हावी असं ज्ञानदेवसुद्धा सांगतातच.