पिंपरी / प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उभी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप सोबत घेऊन गेल्याने या घडामोडींचा मोठा परिणाम पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणावरही होणार आहे. या राजकीय परिणामामुळे पिंपरी-चिंचवडला राज्य व केंद्रातही मंत्रिपद मिळण्याची आशा आता धूसर झाली आहे. परिणामी शहराचा मंत्रिपदाचा ‘बॅकलॉग’ कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या काही महिन्यांपासून होऊ घातलेल्या व अनेक मुहूर्त या ना त्या कारणामुळे टळला होता. या विस्तारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचेही नाव चर्चेत होते. आता मात्र मंत्रिपदाचा भरण्यात येणारा निम्मा कोटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी भरला गेला. त्यात मोठय़ा संख्येने असलेले दावेदार पाहता भाजप शहराचा मंत्रिपदाचा ‘बॅकलॉग’ भरून काढेल की नाही, याची चिंता आता पिंपरी-चिंचवडकरांना आता सतावू लागली आहे.
शहराला खासदार श्रीरंग बारणे यांच्या रुपाने केंद्रातही मंत्रिपद मिळण्याची आशा होती. ते खासदार असलेल्या शिवसेनेमुळे भाजपची पुन्हा सत्ता वर्षभरापूर्वी राज्यात आली. केंद्रातही भाजपला बळ मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद (एकाला कॅबिनेट, तर दुसऱ्याला राज्यमंत्री) दिले जाण्याची शक्यता होती. त्यासाठी मावळचे खासदार बारणे यांचे नाव घेतले जात आहे.
आता भाजपला राज्यातच नाही, तर केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट?) रुपाने आणखी एक नवा नेता आता मिळाला आहे. त्यांचे नऊ आमदार राज्यात मंत्री झाले. तर खासदार प्रफुल पटेल यांचे नाव आता केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात पुढे आले आहे. त्यामुळे तेथील शिंदे गटाची एक जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून पटेल यांना मंत्री केले, तर बारणेंचा पत्ता कट होण्याची भीती त्यांच्या समर्थकांना आता वाटू लागली आहे. परिणामी केंद्रातीलही उद्योगनगरीचे मंत्रिपद हुकते की काय, याची चिंता शहरवासियांना वाटू लागली आहे.
महिला आमदाराला भाजप संधी देणार का?
राज्य मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याने पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे नाव मंत्रीमंडळ विस्तारात घेतले जात होते. पण, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आणखी एका महिला आमदारांना भाजप पुढच्या विस्तारात संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे.