भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये अऊणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ संघर्ष झडल्याची माहिती समोर आली असून, दोन देशांमधील तणाव पुन्हा वाढल्याचे दिसून येते. गेल्या शुक्रवारी तवांग येथील प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी केल्यानंतर त्यास भारतीय सैनिकांनी प्रतिकार केला आणि त्यातूनच झटापट होऊन दोन्ही देशांमधील काही सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. 2020 मधील गलवान प्रकरण, त्यानंतर मागील वर्षीच्या कुरापती आणि सांप्रत संघर्ष यातून चीनचा विस्तारवादच अधोरेखित होत असून, डॅगनच्या या दुखण्यावर इलाज करण्यासाठी सीमा संरक्षणापासून सामरिक व परराष्ट्रनीतीपर्यंत सर्व स्तरावर कसोशीने प्रयत्न करावे लागतील. चीन आणि भारत यांच्यातील लढाई नवी नाही. ‘हिंदी चिनी भाई-भाई’चा नारा सर्वदूर घुमत असतानाच 1962 मध्ये कपटी चीनने भारतावर युद्ध लादले. दरम्यानच्या काळात भारतानेही संरक्षण, अवकाशतंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करण्यासह अण्वस्त्रसज्ज देश म्हणूनही जगात स्थान मिळविले. त्यामुळे भारतासोबत थेट युद्ध करण्याचे साहस चीनने केले नसले, तरी या ना त्या माध्यमातून आपली खुमखुमी दाखवून दिली आहे. वास्तविक गेल्या सहा-सात दशकांच्या कालखंडात चर्चेच्या माध्यमातून दोन देशांतील संबंध दृढ करण्याबाबत भारताने नेहमीच पुढाकार व समन्वयवादी भूमिका घेतली आहे. मात्र, चर्चेचे नाटक करायचे नि पुन्हा फुत्कार काढायचे, ही जुनी चिनी खोड अजूनही कायम दिसते. 2020 मध्ये चिनी सैन्याने गलवान भागात घुसखोरी केली होती. त्या वेळी दोन देशांतील सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. 45 वर्षांतील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या या संघर्षांत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर भारतानेही जोरदार प्रतिकार करीत चीनच्या त्यापेक्षाही अधिक सैनिकांचा खात्मा केला होता, असे म्हणतात. या घटनेनंतर एक पाऊल मागे घेणाऱ्या डॅगनने चर्चेअंती मात्र संयुक्तऐवजी स्वतंत्रपणे पत्रक काढण्याची भूमिका घेतली होती. तेव्हाच ही माघारी क्षणजीवी ठरणार, हे निश्चितच होते. त्यानंतर ऑक्टोबर 2021 दरम्यान उत्तराखंडमधील बाराहोटी भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 100 सैनिकांनी सीमेचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले. याचदरम्यान लडाखमध्येही ड्रॅगनच्या कुरापती पहायला मिळाल्या. आता ज्या भागात चकमक झाल्याचे दिसून येते, तो भागही संवेदनशीलच आहे. अऊणाचल प्रदेशातील या तवांग नामक क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवरून काही ठिकाणी वाद आहेत. त्यामुळे तिथे 2006 पासून दोन्ही देशांचे सैन्य गस्त घालत असते. मागील काही दिवसांत होत असलेली बर्फवृष्टी पाहता या भागांत डोळ्यात तेल घालून बंदोबस्त ठेवणे, हे सैन्यदलाकरिता आव्हान ठरावे. तथापि, या साऱ्यास भारतीय सैनिक खरे उतरलेले दिसतात. चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन भारताकडून प्रत्यक्ष ताबारेषेनजीक शस्त्रसज्जता आणि पायाभूत सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिनी सैनिकांवर पाळतही ठेवण्यात येत आहे. या दक्षतेमुळेच भारतीय सैनिकांना पीपल्स लिबरेशन आर्मीचा यशस्वी प्रतिकार करता आला, असे म्हणता येईल. अर्थात या चकमकीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. तरी चीनचा घुसखोरीचा प्रयत्न आपण हाणून पाडला असेल, तर ती मोठीच कामगिरी ठरावी. चीनचा आक्रमक पिंड पाहता यापुढेही बारीकसारीक गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. खरे तर सीमावादावर या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये सातत्याने चर्चा होत असतात. मात्र, चीनचा आडमुठेपणा कमी झाल्याचे पहायला मिळालेले नाही. त्यामुळे यातून सर्वमान्य तोडगा निघण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. वास्तविक, चीन हा जगातील प्रचंड महत्त्वाकांक्षी देश आहे. अमेरिकेवर मात करून जागतिक महासत्ता हे स्थान त्यांना प्राप्त करायचे आहे. त्याचबरोबर आशिया व हिंदी महासागराच्या टापूतही त्यांना आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठीच आपला विस्तारवादी फॉर्म्युला ते सातत्याने रेटत असतात. मागच्या काही काळात दोन देशांच्या सीमा प्रदेशात पायाभूत सुविधांचे जाळेच चीनने विणले आहे. त्यामागचा हेतू आता लपून राहिलेला नाही. भारताला चीनपासूनच सर्वाधिक धोका असल्याचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी म्हटले होते. हा इशारा किती दूरगामी होता, हे सध्याच्या घटनांवरून ध्यानात यावे. वास्तविक चीनचे शेजारील जवळपास सर्वच राष्ट्रांशी सीमातंटे आहेत. हिंदी महासागरातील वर्चस्वावरून जपानशीही त्यांचा संघर्ष सुरू आहे. भविष्यात भारतालाच नव्हे, तर नेपाळ, श्रीलंका, म्यानमार या देशांनाही चीनच्या विस्तारवादाचा धोका संभवतो. आजमितीला अमेरिका व चीनमध्ये शीतयुद्धसदृश स्थिती आहे. या सगळ्या जागतिक धबडग्यात भारताला राजकीय व परराष्ट्रीय स्तरावर कमालीची मुत्सद्देगिरी दाखवावी लागेल. तसेच चीनविरोधात वेगवेगळ्या देशांची एकजूट उभी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे या संघर्षाची धग राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली असून, संसदेतही त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. याबाबत संरक्षणमंत्र्यांनी निवेदन केले असले, तरी त्याने विरोधकांचे समाधान झाल्याचे पहायला मिळत नाही. परंतु, याविषयावर सत्ताधारी व विरोधकांनी आपापसांतील सर्व मतभेद विसरून एकत्र यावे. विरोधकांचे म्हणणे सत्ताधाऱ्यांनी ऐकून घ्यावे. त्यांच्या काही सूचना असतील, तर त्याचा विचार करावा. तर सत्ताधाऱ्यांची बाजू समजून घेऊन विरोधकांनीही आपले पाठबळ द्यावे. सीमासंघर्ष सद्य:स्थितीत निवळल्यासारखा दिसत असला, तरी तो केवळ आभास असू शकतो. चीनचा गुणधर्म पाहता पुन्हा त्यांच्याकडून आगळिक होणार नाही, याची हमी देता येत नाही.
Previous Articleजबाबदारी म्हणून बघायला हवे!
Next Article पोलंडची स्वायटेक सर्वोत्तम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.