तुरंबे /श्रीकांत जाधव
राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून काळम्मावाडी येथील दूधगंगा धरण प्रकल्पाची ओळख आहे. मात्र धरणावर दहा वर्षापासून भूकंपमापन यंत्रणा नाही. वारणा धरण परिसरात बुधवारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. काळम्मावाडी धरणाला लागलेली गळती पाहता धरणावर भूकंपमापन यंत्रणा असणं अत्यंत गरजेचे आहे. या धरणाची सुरक्षा तर ‘राम भरोसे’ झाली आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच अशा गंभीर बाबीकडे जलसंपदा विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न ‘गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेट्टी यांनी केला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळमवाडी येथील दूधगंगा जलाशयाची ओळख आहे. मात्र धरणावर दहा वर्षापासून भूकंपमापन यंत्रणा नाही. राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून काळम्मावाडी येथील दूधगंगा जलाशयाची ओळख आहे. धरणाला लागलेली गळती पाहता धरण सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. धरणावर मोजकेच कर्मचारी असल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे झाले आहे. अशातच धरणात सध्या 21.37 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 84 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणावर भूकंपमापन यंत्रणा असणं अत्यंत गरजेचे आहे.
सध्या काळम्मावाडी धरणातील पाणी आपापल्या भागात नेण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते मोठी धडपड करत आहेत. मात्र धरणाच्या सुरक्षेसाठी कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. आमदार पी एन. पाटील यांनी लक्षवेधी केली आणि हा प्रश्न खऱ्या अर्थाने उचलून धरला आहे. मात्र याला आता जोर लावणे गरजेचे असल्याचे तायशेट्टी यांनी सांगितले.