ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात दगडी कोळशाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लि. चे (केपीसीएल) सर्व 13 औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. त्यामुळे यंदा राज्यात भारनियमन जारी करण्याची परिस्थिती उद्भवणार नाही, असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी दिली. राज्यात दगड कोळशाचा तुटवडा भासत असल्याने वीजनिर्मिती केंद्रे बंद ठेवण्यात येत असल्याचे वृत्त प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
केपीसीएलच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व 13 औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मागील 5 वर्षांत औष्णिक वीजप्रकल्पाद्वारे प्रथमच एकूण 5020 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. राज्यात कोठेही दगडी कोळशाची कमतरता नाही. पुरेसा दगडी कोळसा साठा असल्याने कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. ऊर्जा खात्याने खबरदारी घेतल्यामुळेच वीज मागणी आणि पुरवठय़ात समतोल साधणे शक्य झाले आहे, अशी माहिती सुनीलकुमार यांनी दिली आहे.
सामान्य कालावधीत 3096 मे. वॅट वीजनिर्मिती
2017 मध्ये यरमरस औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून (वायटीपीएस) वीजनिर्मिती सुरू झाली तेव्हा राज्यातील सर्व केंद्रांमध्ये पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती झाली होती. त्यानंतर 4 मे रोजी अशी कामगिरी झाली आहे. देशातील काही राज्यांमध्ये दगडी कोळशाच्या पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत असताना राज्यात मात्र ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जात आहे. सामान्यपणे वीज मागणीच्या आधारे वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वीज उत्पादन निश्चित केले जाते. सामान्य कालावधीत केपीसीएल 3096 मे. वॅट वीजनिर्मिती करते, असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रांमध्ये मागणीनुसार नेहमी 5 दिवस पुरेल इतका दगडी कोळशाचा साठा आहे. पुढील कालावधीसाठी आवश्यक असणारा दगडी कोळसाही नियमीतपणे पुरवठा केला जात आहे. रायचूर औष्णिक वीज केंद्रात (आरटीपीएस) 1,16,268 मे. टन, बळ्ळारी औष्णिक वीज केंद्रात (बीटीपीएस) 26,783 मे. टन, यरमरस औष्णिक वीज केंद्रात (वायटीपीएस) 1,02,287 मे. टनसह एकूण 2,45,338 मे. टन दगडी कोळशाचा साठा आहे. राज्याला 5 दिवस पुरेल इतकी वीजनिर्मिती करण्यासाठी दगडी कोळसा शिल्लक ठेवला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
5 वर्षांनंतर महत्वाची कामगिरी
राज्यात दगडी कोळशाचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. खबरदारी घेतल्यामुळे 5 वर्षांनंतर राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रे पूर्ण प्रमाणात कार्यरत आहेत. ही महत्त्वाची कामगिरी आहे, असे ऊर्जामंत्री सुनीलकुमार म्हणाले.