सेनापती कापशी सदाशिव आंबोशे
कागल तालुक्यातील सर्वच नेते एकाच विचारधारेच्या प्रवाहात आले असले तरी, कागलच्या राजकीय विद्यापीठात संघर्ष अटळच आहे. याला मागील अनेक वर्षांचा इतिहास साक्षीला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले. त्यामुळे 2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप घडला. तर कागलचे आमदार हसन मुश्रीफही अजित पवार यांच्या बरोबर गेले, कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि कागल तालुक्यात मोठे वादळ उठले असून मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष अटळ आहे, हेच अधोरेखित झाले. दोघा नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे मेळावे घेऊन शक्तीप्रदर्शन केले. याचाच अर्थ कागलचे राजकारण नेहमीप्रमाणे त्यांच्या जुन्याच वळणाने जाणार हे स्पष्ट होते.
कागल तालुक्यात समरजितसिंह घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ गटाचे मेळावे एका पाठोपाठ झाले. यातून मोठे शक्तीप्रदर्शन पहावयास मिळाले. समरजितसिंह घाटगे यांनी 2024 ला विधानसभा ताकदीने लढण्याचा ठाम निर्णय घेतला असून 2024 चे भूमिपूजन केल्याचे मेळाव्यात सांगितले. तर मंत्री मुश्रीफ यांच्या मेळाव्यात भूमीपूजनच काय? आम्ही वास्तुशांतीही घातल्याचे प्रत्युत्तर दिले. सत्ता बदलाच्या सारीपाटात राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आणि कागलच्या राजकीय विद्यापीठातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले.
कागलचे राजकारण फार वेगळ्या वळणावरील आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या धाटणीवर पार पडते. यापूर्वी कागल तालुक्यात स्व. विक्रमसिंह घाटगे – स्व. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ – माजी आमदार संजयबाबा घाटगे, त्यानंतर काही काळ मंडलिक – मुश्रीफ आणि अलिकडील मंत्री मुश्रीफ – समरजितसिंह घाटगे यांच्यातील टोकाचा संघर्ष कागल तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिह्याने पाहिला आहे, अनुभवला आहे. ज्यावेळी संपूर्ण देशात आणि राज्यातही काँग्रेसचेच सरकार होते. त्यावेळी एकाला पक्षाचे तिकीट मिळायचे, दुसऱ्याने बंडखोरी करायची. निवडून येतील ते काँग्रेस सरकारमध्ये सामील होत होते.
मधल्या काळात तर पक्षात विभागणी झाली. कागलमध्ये मात्र पक्षाला कधीच स्थान मिळाले नाही. इथे गटा- तटाचे राजकारण चालले. नंतर गटातही फूट पडली. कागल तालुक्यातील दोन प्रमुख घाटगे-मंडलिक अशा गटात फूट पडत चार प्रमुख गट तयार झाले. आपल्या गटाला संधी कशी मिळेल? ही विचारधारा पुढे आली. त्यातून स्व. ससदाशिवराव मंडलिक लोकसभा लढवत राहिले, मुश्रीफ विधानसभा लढवत राहिले. विरोधात घाटगे गटच राहिला.
स्व. माजी खासदार मंडलिक यांच्यानंतर प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे खासदारकीचा वारसा आला असून त्यांची 2024 चीही तयारी सुरू आहे. तर खासदार मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागत व सत्कार समारंभात आवर्जून उपस्थित राहिले. जिह्याच्या विकासासाठी आणि शाहू महाराजांचे विचार रुजवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांच्यासहीत सर्वांना बरोबर घेऊन मंत्री मुश्रीफ यांनी जिह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी त्यांनी जाहीर सभेत विनंती केली. या घटनेवऊन कागलमधील आगामी राजकारणाची चुणूक दिसून येते.
आजच्या घडीला शिंदे गटात खासदार संजय मंडलिक आहेत. माजी आमदार संजयबाबा घाटगे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. आता मंत्री मुश्रीफ महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने संजयबाबा घाटगे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. परंतू ते मुश्रीफ यांना सोडून विरोधात जातील असे दिसत नाही. शनिवारी मंत्री मुश्रीफ यांना भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ही सर्व राजकीय पार्श्वभूमी असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कागल मतदारसंघात कोणती राजकीय समीकरणे तयार होतील हे पहावे लागणार आहे.