राधानगरी, दाजीपूर अभयारण्यावर लक्ष, गडकिल्ल्यांची जपणूक ही काळाची गरज, राज्यात पर्यटन सप्ताह सुरू, कोल्हापुरात काय…?
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा जैवविविधतेने संपन्न.. धार्मिक अन् सांस्कृतिक परंपरेची त्याला मिळालेली जोड.. तरीही पर्यटनाच्या दृष्टीने विकासात मागे पडतोय. पर्यटन विकासासाठी जैवविविधता, प्राचीन वास्तू, गडकिल्ले असूनही पर्यटनवाढीसाठी विकासात्मक दृष्टी गरजेची बनली आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटनवाढीसाठी थोडेफार प्रयत्न झालेही, पण त्यालाही मर्यादा होत्या. मंगळवारी 27 रोजी जागतिक पर्यटन दिन.. या पार्श्वभूमीवर पर्यटनवाढीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी असूनही नेमकी दिशा चुकतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून राज्यात विविध ठिकाणी पर्यटन सप्ताह साजरा होत आहे, पण कोल्हापुरात या सप्ताहाचे काहीच सकारात्मक चित्र नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला रोज हजारो भाविक, पर्यटकांची गर्दी होत आहे. परिसरातील नवदुर्गा अन् वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिराला भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर, खिदापुर येथील कोपेश्वर मंदिर, विविध गावांतील ग्रामदेवतांची मंदिरेही आहेत. दाजीपूर, राधानगरी अभयारण्य, पन्हाळगड, विशाळगड, भुदरगड, गगनगड आहे. प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तूसह कोल्हापुरी गुळ अन् चप्पलांसाठी कोल्हापूर परिचित आहे. त्यातूनच भाविकांसह पर्यटकांचा कोल्हापूरकडे अधिक ओढा आहे.
कोल्हापुरात मधल्या काळात डेक्कन ओडीसीचा प्रयोग झाला, यातील प्रवाशांना कोल्हापुरातील मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांपासून ते कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूंपर्यंतची माहिती दिली गेली. पण त्यानंतर यात शिथिलता आली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे गेली, त्यानंतर पावसाळी हंगामात जिल्हय़ातील पर्यटनस्थळे बहरली, धबधब्यांवर गर्दी झाली. पण परजिल्हय़ातील पर्यटकांचा ओढा तसा कमीच राहिल्याचे चित्र आहे. परिणामी राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाचे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिरासह जुना राजवाडा, नवा राजवाडा, टाऊन हॉल म्युझियम, साठमारी, रंकाळा तलावाकडे पर्यटक भेट देतात, जोतिबाला जाणारे भाविक पन्हाळगडाला भेट देतात. पण जिल्हय़ातील अन्य ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांकडे ते वळण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. वन विभागाने काही महिन्यांपूर्वी राधानगरी अभयारण्य बस सुरू केली, पण तीही आता थांबली आहे. जिल्हय़ात पर्यटन विकासासाठी अधिक संधी आहे. पण त्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न होत नाहीत, अशी स्थिती आहे. अगदी येथील पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालयही बंद आहे. उद्योग भवनातील एका खोलीत सुरू असलेला महामंडळाचा कारभार पाहिल्यास येथील पर्यटनाचा विकास कसा होणार, हा प्रश्न आहे. जिल्हय़ाच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोल्हापुरात विभागीय कार्यालय सुरू होण्याची मागणी पुढे येत आहे.
चौकट
राज्यात पर्यटन सप्ताहांतर्गत विविध उपक्रम सुरू
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंगळवारी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन केले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचे पर्यटन दिनाचे ‘रिथिंकींग टुरीझम’ असे घोषवाक्य आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम येथे ‘पर्यटन सप्ताह’ राबवला आहे. त्याची सांगता 29 रोजी होणार आहे. यादिवशी पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथे शुभेच्छा देत स्वागत करण्यात येणार आहे. पर्यटक निवासामध्ये येणाऱयांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. ‘पर्यटनावर पुनर्विचार’वर विविध स्पर्धा, व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी दिली.
पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक स्थळी पदयांत्रांचे आयोजन, छोटय़ा मॅरथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, पदभ्रमंती उपक्रम राबवण्यात आले आहेत. याद्वारे पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी यांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.