राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी परंपरा कायम केलेली कागदपत्रे उपलब्ध : अशोक साळोखे व मोहन पोवार यांची पिढी कार्यरत
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
अंबाबाई मंदिरात प्राचीन काळापासून सनई-चौघडा वाजवण्याची परंपरा होती. ही परंपरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे कायम केली, ती आजतागायत सुरू आहे. सनई-चौघडय़ाच्या सुरात मंदिरात भक्तीमय वातावरण निर्माण होते, शास्त्रीय संगीतातील ताल, सूर, लय मनाला प्रसन्न करते. त्यामुळे अध्यात्मिक एकाग्रता वाढवण्यासाठी अंबाबाई मंदिरात दिवसातून पाचवेळा सनई-चौघडा वाजवला जातो. सुरूवातीला शाहू महाराजांनी सनई-चौघडा वाजवण्यासाठी 12 नगारजींची नेमणूक केली होती. त्यानंतर हा मान घडशी समाजाकडे मिळाला त्यांनी दीडशे वर्षापासूनची परंपरा आजपर्यंत जपली आहे.
सनई-चौघडा वाजवण्याची प्राचीन परंपरा असली तरी शाहूकालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. सध्या वंशपरंपरागत घडशी समाजातील मोहन पोवार, बाबासाहेब उर्फ चंद्रकांत पोवार, अमित साळोखे हे सनई चौघडा वाजवत होते. गेल्या दोन महिन्यापुर्वी बाबासाहेब साळोखे यांचे निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या घराण्याची परंपरा खंडीत झाली. पण त्यांचे चुलतभाऊ मोहन पोवार आणि त्यांचा मुलगा ओंकार पोवार हे अंबाबाईच्या सेवेत चौघडा वाजवत आहेत. यामध्ये अशोक साळोखे यांचा मुलगा अमित साळोखे वाजवत असून ही पाचवी पिढी तर मोहन पोवार यांची तिसरी पिढी नगारजी म्हणून कार्यरत आहे.
हे ही वाचा : लेसर शोच्या झगमगाटात मिरवणूकीने दुर्गामूर्तीचे आगमन
पूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व करवीरपीठाचे शंकराचार्य अंबाबाई मंदिरात आल्यानंतर सनई-चौघडा व नौबत वाजवली जात होती. आताही ही परंपरा कायम आहे. पहाटेच्या प्रहरी 5.30 वाजता काकड आरतीपूर्वी नगारा आळवला जातो. यामध्ये भैरव रागाचे आहीर भैरव, नट भैरव, बैरागी भैरव यासह अन्य राग आळवले जातात. आरतीपूर्वी सकाळी 9.30 वाजता तोडी रागाच्या प्रकारात नियाकी तोडी, गुजरी तोडी, बिलास खानी तोडी राग आळवला जातो. आरतीपूर्वी सकाळी 11.30 वाजता सारंग रागात रूंदावणी सारंग, शुध्द सारंग, मदमाद सारंग हे राग वाजवले जातात. दुपारी 2.30 वाजता भिम पलास रागामध्ये मधुवंती, मुलतानी, पटदीप राग आळवले जातात. तर रात्री 7.30 वाजता कल्याण रागामध्ये मारवा, पुर्याधनाश्री, यमन, दुर्गा, देस राग आळवला जातो.
पूर्वी अंबाबाई मंदिर, चित्रदुर्ग मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप येथे सनई-चौघडा वाजवण्याची परंपरा होती. सध्या फक्त अंबाबाई मंदिरात सनई-चौघडा वाजवला जातो. तर भवानी मंडपमध्ये नवरात्र महोत्सवात 10 दिवस वाजवला जातो. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील सनई-चौघडय़ाला वेगळे महत्व आहे. पूर्वी येथे 12 लोक नगारजी म्हणून कार्यरत होते. या बारा नगारजींची मुल शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करू लागले. त्यामुळे त्यांच्या घराण्यातील पुढची पिढी अंबाबाई देवीच्या सेवेत राहिली नाही. परंतू सध्या अमित साळोखे, मोहन पोवार व ओंकार पोवार हे तिघेजण सनई चौघडा वाजवत आहेत. त्यांनी सनई-चौघडय़ाची परंपरा जपून सांस्कृतिक ठेवा पुढे चालवलण्याचा संकल्प केला आहे. ही परंपरा पुढच्या पिढीला समजावी म्हणून आपल्या मुलांना लहानपणापासूनच सनई चौघडा वाजवण्याचे प्रशिक्षण देतात. जेणेकरून आपले घराणे अंबाबाई देवीच्या सेवेत कायम राहिल यासाठी प्रयत्नशील आहेत.
आधुनिक साऊंड सिस्टीम
देवस्थान समितीने सध्या अत्याधुनिक पध्दतीची साऊंड सिस्टम दिल्याने चार दरवाज्यांपर्यंत सनई चौघडय़ांची धुन भाविकांच्या कानावर पडते. तसेच नगारजींचे कष्टही कमी झाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जातेय. उत्सव मूर्तीच्या पालखी सोहळय़ाला सनई-चौघडा वाजवून सलामी दिली जाते.
अंबाबाईची सेवा म्हणून सनई चौघडा वाजवतो
अशोक साळोखे यांचा मुलगा अमित साळोखे यांनी संगीतशास्त्रातील हार्मोनियममध्ये एम. ए. करून नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. संगीत विशारद म्हणून त्यांची ओळख आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ते साथसंगत करतात. तरीही देवीची सेवा म्हणून अंबाबाई मंदिरात सनई वाजवतात. शास्त्रीय संगीताची परंपरा भावी पिढीला देण्याचा त्यांचा मानस असल्याने त्यांचा छोटा मुलगा हर्षितला ते शिक्षण देण्यासाठी बरोबर घेऊन येतात. तर मोहन पोवार चौघडा तर त्यांचा मुलगा ओंकार पोवार देवीची सेवा म्हणून नौबत वाजवतो.