केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादन ः आधुनिकीकरणाला प्राधान्य देणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
व्यापाऱयांनी आता आपला व्यवसाय डिजिटल स्वरुपात करण्याची आवश्यकता असल्याचे महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. आज सर्व स्तरावर डिजिटलचे अनुकरण केले जात असून व्यावसायिकांनीही याचा स्वीकार करायला हवा, असेही इराणी यानी सांगितले.
यावेळी इराणी यांनी आजच्या बदलत्या युगाचा विचार करुन व्यावसायिकांनी अधिकाधिक आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. डिजिटलीकरणाने आपला व्यवसाय अधिक समृद्ध करण्याची गरज असल्याचे सांगितले.
मंत्री इराणी या नवी दिल्लीत व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स (कॅट)यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. देशाच्या राजधानीमधून कॅट ‘भारत ज्ञान मिशन’ची सुरुवात करत असून या योजनेचा लाभ देशभरातील व्यापाऱयांनी आवश्य घ्यावा. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपला व्यवसाय अधिक वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही मंत्री इराणी यांनी यावेळी केले.
कॅटतर्फे या कार्यक्रमासह देशभरात ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे, की मागील काही वर्षांच्या दरम्यान विदेशी ई कॉमर्स कंपन्या तसेच मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या रिटेल व्यवसायात भाग घेण्यासाठी धडपडत आहेत. तेव्हा या मिशनच्या माध्यमातून व्यापारी, व्यावसायिक यांना डिजिटलीकरणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एवढंच नाही तर संबंधीत व्यापारी, व्यावसायिक संबंधीतांना डिजिटलविषयी जास्तीत जास्त मार्गदर्शन केले जाणार आहे.