रहदारी पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील रघुनाथपेठ, बाबले गल्ली कॉर्नर तसेच चौथा रेल्वेगेट या परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचारीही अक्षरश: वैतागले आहेत. या रस्त्यावर मोठी वाहतूक होत आहे. मात्र दोन्ही बाजुला वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी अनगोळ परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांतून होत आहे.
अनगोळ, उद्यमबाग, मजगाव परिसराचा विस्तार वाढत चालला आहे. अनेक भागातील रस्ते या नगरांना जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळचा रस्ता म्हणून या रस्त्यावरूनच ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांबरोबरच ट्रॅक्टर तसेच इतर वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
उद्यमबागला जाणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. याचबरोबर महाविद्यालये तसेच शाळादेखील अधिक आहेत. त्या शाळांना विद्यार्थी ये-जा करत असतात. अनगोळ येथील रघुनाथपेठ, बाबले गल्ली या परिसरात रिक्षाचालक दोन्ही बाजुला रिक्षा पार्किंग करत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या परिसरातील घरासमोर व दुकानांसमोर दुचाकीदेखील पार्किंग करण्यात येत आहेत. रस्ता अरुंद असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तेव्हा नागरिकांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे वाहने पार्किंग करावीत, अशा प्रतिक्रिया अनगोळ परिसरातून उमटत आहेत.
अनगोळच्या मुख्य रस्त्यापासून चौथे रेल्वेगेट व बेम्कोपर्यंतच्या रस्त्यापर्यंत आता रहदारी पोलिसांनी सेवा बजावावी. त्यामुळे रस्त्यावर पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.