मांजरी वार्ताहार– अंकली- मांजरी परीसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रात्रभर पावसाने धुमाकूळ घातल्याने परीसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवारात पाणी साचले असून अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या ऊस गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी वातावरण स्वच्छ होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच परतीच्या पावसाचा फटका बसला असून, परिसरात गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झाले आहेत. यामुळे शेती वस्तीतील अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. चारा आणण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना रस्ता पाण्याखाली गेला असल्याने अडचणीचे ठरत आहे. काही ठिकाणी सुरू असलेल्या ऊस तोडीवर ही याचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी बांध व माती वाहून गेल्याचे प्रकारे घडले आहेत. शुक्रवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली रात्री अकरा पासून सुरू झालेला पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत कोसळत होता. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी राहीले असून, अंकली येथील रायबाग बायपास रोडवर नाल्याचे पाणी चिक्कोडी मिरज राज्य महामार्गावर पसरल्याने शनिवारी वाहतूक खोळंबली. या मार्गावर शनिवारी सकाळी तीन फुट फुट पाणी होते. केवळ बस व ट्रक यांची वाहतूक सुरू होती. या मार्गावर पाणी प्रचंड प्रमाणात पसरल्याने दुचाकी व चारचाकी लहान वाहनांना ताटकळत राहावे लागले. वाहतूक बंद असल्याने दुचाकी वरून मिरज व सांगलीला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी अंकली परिसरातील नागरिकांना फोन करून पाण्याची स्थिती जाणून घेतली. मार्ग बंद असल्याने काही जणांनी प्रवास करणे टाळले. या मार्गातील सर्व रस्त्यांवर ओढे व नाल्याचे पाणी असल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली.
Previous Articleपटकन होणारी खुसखुशीत रवा चकली
Next Article सांगलीतील व्यापाऱ्याचे ८० लाख लुटले