रत्नागिरी / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवरील तब्बल 1,677 शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्ती आणि रुजू होण्याचे आदेशावर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची स्वाक्षरी झाली आहे. पण या बदलीतील 134 जणांनी या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या बाबत त्यांची सुनावणी लावण्यात येऊन शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या बाबत प्रशासन लवकरच अंतिम निर्णय देणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा जिल्ह्यातील संवर्ग 1 ते 5 मधील मराठी माध्यमातले 1 हजार 520 तर उर्दू माध्यमातील 157 अशा एकूण 1 हजार 677 गुरूजींच्या बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या आदेश देण्यात आले आहेत. ग्रामविभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक बदली पकिया राबवताना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावरून सुरू झाली. बदली प्रणालीत टप्पा 1, 2, 3, 4, 5 व 6 मधील कार्यवाही करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. कोविडच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदा यंदा येत्या आठवडाभरात बदली झालेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त होऊन नव्या शाळेत रुजू होण्याचे आदेश पशासनस्तरावरुन देण्यात आले आहेत.
जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन ठिकाणी शिक्षक हजर होणार आहेत. आधी कोविडमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या लांबल्या होत्या. त्यानंतर ऑनलाईन बदलीसाठी तयार करण्यात येणाऱया सॉफ्टवेअरसाठी एक वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर या ऑनलाईन बदली प्रकियेतील अडथळे पार करत शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.
बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या बदलीचे ऑनलाईन ठिकाणाची माहिती मिळालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बदली झालेल्या शिक्षकांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यंदाही जिल्हांतर्गंत शिक्षक बदल्या होणार की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला संभ्रम कार्यवाहीमुळे दूर होण्यास मदत झाली आहे.