केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांचे प्रतिपादन : तीन दिवसीय पर्पल महोत्सवाचा दिमाखदार समारोप
प्रतिनिधी /पणजी
दिव्यांगांची सेवा ही ईश्वरसेवेसमान असून त्यांना बुद्धीहीन म्हणणे म्हणजे आम्ही स्वतःच्या निर्बुद्धतेचे, मुर्खतेचे प्रदर्शन करण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
वैविध्यतेचा सोहळा ठरलेल्या पर्पल महोत्सवाच्या समारोपप्रंसगी ते बोलत होते. आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजित या सोहळ्यास त्यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, साबांखामंत्री नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, दिव्यांग आयुक्त गुरूप्रसाद पावसकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, समाजकल्याण सचिव सुभाष चंद्र, यांच्यासह अन्य विविध राज्यांचे सरकारी सचिव, संचालक, अधिकारी आणि दिव्यांगमित्र यांची उपस्थिती होती.
पर्पल महोत्सव हे आदर्श उदाहरण
पुढे बोलताना नाईक यांनी, अनेकांच्या घरी दिव्यांग मुले जन्मास येतात. परंतु लोकलज्जेमुळे अनेकदा त्यांना समाजापासून दूर ठेवण्यात येते. खरे तर दिव्यांगाना दयेची नव्हे तर प्रेम, मायेची, समजून घेण्याची गरज आहे. त्यांची ही गरज आज सर्वांना कळून चुकली आहे. म्हणुनच समाज त्यांना स्वीकारू लागला आहे. त्यांच्या सेवेसाठी लोक सहकार्याचा हात पुढे करू लागले आहेत. त्यांची काळजी घेऊ लागले आहेत. त्यातून त्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळू लागली आहे. पर्पल महोत्सव हे त्याचे आदर्श उदाहरण आहे, याचा मला अभिमान आणि संतोष वाटत आहे, असे नाईक म्हणाले.
दिव्यांगांकडून शिकण्यासारखे खूप काही
या मुलांकडून आम्हाला शिकण्यासारखे खूप काही आहे. इतरांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, हक्क हिरावून घेणे यासारख्या गोष्टी त्यांच्या गावीही नसतात. त्यांच्या नजरेत सर्वजण एकसमान असतात. आमच्याकडून त्यांना केवळ प्रेम, माया हवी असते. आम्ही सर्वांनी ती त्यांना द्यावी, असे आवाहन नाईक यांनी केले.
हा महोत्सव गोव्यातच व्हावा : फळदेसाई
या महोत्सवाचे कायमस्वरुपी गोव्यातच आयोजन करावे, अशी इच्छा समाज कल्याणमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने आपण केंद्रातून प्रयत्न करीन. तरीही त्यात यश आले नाही तर गोव्याने स्वतःचा राज्यस्तरीय महोत्सव दरवर्षी आयोजित करावा, असा सल्ला नाईक यांनी दिला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलताना, विशेष क्षमतेचे दिव्यांगजन स्वतःचे परावलंबत्व इतरांवर लादू नये यासाठी कोणकोणत्या सुविधा, तंत्रज्ञानाचा आविष्कार करतात, त्यांची मदत घेतात याचा साक्षात्कार या महोत्सवाच्या निमित्ताने झाला, असे प्रतिपादन केले. याकामी त्यांना सहकार्य करणाऱया सर्व बिगर सरकारी संस्था संघटना त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हा महोत्सव गोव्यातच व्हावा यासाठी आमचे प्रयत्न असून त्यात यश मिळाल्यास इफ्फीच्या धर्तीवर हा महोत्सवही कायमस्वरुपी गोव्यात आयोजित करण्यात आम्हाला आनंद वाटेल. तरीही तसे न झाल्यास आम्ही राज्यपातळीवर दरवर्षी अशा महोत्सवाचे आयोजन करू, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
मंत्री फळदेसाई यांनी बोलताना, या महोत्सवास मिळालेले यश कल्पनेपलिकडील होते, आपणा सर्वांच्या सहयोगामुळे आतापर्यंत कोणत्याही राज्यात झाला नाही, असा महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला, असे प्रशंसोद्गार काढले.
दिव्यांग आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी स्वागत केले. या महोत्सवाची तयारी गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून सुरू होती. त्यासाठी खात्यातील सर्व कर्मचारी आणि सुमारे 800 स्वयंसेवक दिवसरात्र अविश्रांत मेहनत घेत होते. महोत्सवाच्या तीन दिवसांमध्ये तर त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. म्हणुनच हा महोत्सव यशस्वी करणे शक्य झाले, असे पावसकर म्हणाले. राजदीप यांनी सूत्रसंचालन केले. राज्य आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांनी आभार व्यक्त केले.
महोत्सवाचा समारोपाचा दिवस क्रीडा स्पर्धा, विविध कार्यशाळा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्मरणीय तसेच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि आनंददायी ठरला.