प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्हय़ातील माणगाव-रेपोळीनजीक ट्रक व इको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातास ट्रकचालकच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ट्रकचालकाच्या चुकीमुळेच 10 जण प्राणास मुकल्याचे उघड झाले आहे. या अपघातप्रकरणी ट्रकचालक अमृत शंकर खेतरी (46, रा. रत्नागिरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अमृत खेतरी हा ट्रक घेवून लोटे औद्योगिक वसाहतीतून मुंबईच्या दिशेने जात होता. मालाड-मुंबई येथून इको कारमधून पंडित व जाधव कुटुंबिय गुहागर तालुक्यातील हेदवी-जुवेवाडी येथील वर्षश्राद्धासाठी येत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ट्रक व इको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 5 पुरूषांसह 3 महिला व एका 12 वर्षीय बालिकेसह 4 वर्षीय बालकावर काळाने घाला घातला. या भीषण अपघाताचे नेमके कारण पुढे आले आहे.
मुंबईच्या दिशेने जाणाऱया ट्रकचालकाच्या चुकीमुळेच 10जणांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. या मार्गावर असलेल्या दुभाजकाकडे दुर्लक्ष करत ट्रकचालक चुकीच्या बाजूने 1 कि.मी. अंतरापर्यंत ट्रक चालवत राहिल्यामुळेच समोरून येणाऱया इको कारवर जावून आदळला. चालकाच्या एका चुकीमुळे 10 जणांना हकनाक जीव गमवावा लागला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक करत अपघाताचे नेमके कारण शोधून काढले.
याशिवाय या अपघातास ट्रकचालकासोबतच कंत्राटदारही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महामार्गावर माणगाव ते लोणेरेदरम्यान काही ठिकाणी उड्डाणपूल व दुभाजकांची कामे सुरू असल्याने रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र वाहतूक वळवल्याबाबत माहिती देणारे कुठल्याही प्रकारचे सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. यामुळे भीषण अपघातास संबंधित कंत्राटदारही जबाबदार असून त्याच्यावरही कारवाईची मागणी करण्यात येत आहे.