कृषी खात्याने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी
वाळपई : सत्तरी तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होणार आहे. मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे हळदीचे उत्पादक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे कृषी खात्याने बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. सध्या उत्पादित केलेल्या हळदीचा साठा बाजारपेठे अभावी पडून आहे. यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सत्तरी तालुक्यातील जमीन ही हळद लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. रानटी जनावरांचा उपद्रव या उत्पादनाला होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी हळद उत्पादनावर विशेष भर दिलेला आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. यंदा प्रचंड प्रमाणात हळदीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र उत्पादित हळदीला बाजारपेठ मिळण्याची गरज आहे.
उत्पादकांसमोर बाजारपेठेचा प्रश्न
अनेक ठिकाणी हळदी उत्पादकांनी हळद तोडलेली आहे. मात्र ती अजूनही घरात पडून आहे. त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झालेली नाही. यामुळे हळद उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. कृषी खात्याच्या सल्ल्यानुसार हळद लागवड केली. सत्तरी तालुक्यामध्ये पिकणारी हळद ही पूर्णपणे सेंद्रीय आहे. यामुळे ही हळद आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. तिला चांगला दर अपेक्षित आहे. मात्र सध्यातरी बाजारपेठेमध्ये या हळदीला मागणी नसल्यामुळे हळद उत्पादकांची चिंता वाढली आहे.
‘गोवा बागायतदार’कडून प्रक्रिया करण्याचा सल्ला
काही उत्पादकांनी या संदर्भात गोवा बागायतदाराशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून या हळदीवर प्रक्रिया करा, त्यानंतर ती विकत घेऊ असे सांगण्यात आले. सध्यातरी उत्पादन झालेली हळद पडून आहे. त्यावर आवश्यक प्रक्रिया करणे शक्य नाही. सदर प्रक्रिया करण्यासाठी अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. यामुळे गोवा बागायतदार संस्थेला प्रक्रिया केलेली हळद देण्यासाठी आवश्यक भाव मिळण्याची शक्यता नाही.
मोठ्या प्रमाणात हळद पडून : भीमराव राणे
अडवई येथील भीमराव राणे व खडकी येथील महादेव नाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन करण्यात आलेले आहे. सध्या हळद तोडण्यात आलेली आहे. मात्र अपेक्षित दर मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. भीमराव राणे याबाबत म्हणाले, सुमारे दीड टन हळद उत्पादित झालेली आहे. विक्रीसाठी अनेकांशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर न आल्यामुळे उत्पादित झालेली हळद वाया जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. तसे झाल्यास लाखो ऊपयांचा फटका आपल्याला बसण्याची भीती आहे. कृषी खाते उत्पादकांना मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्याचा सल्ला देत आहे. मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
कृषी खात्याने विशेष नियोजन करावे!
पाऊस सुरू झाल्यानंतर लावलेली हळद काढण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यासाठी कृषी खात्याने आतापासूनच यासंदर्भात योजना तयार करावी अशी मागणी केली जात आहे. बाजारपेठेमध्ये ही हळद शेतकरी बांधवांना त्रास न देता विक्रीस काढावी, यासाठी खात्याने विशेष नियोजन करावे, अशी मागणी आज उत्पादकांनी केलेली आहे. अन्यथा आगामी काळात हळद लागवडीचा फटका करून शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे