अध्याय एकोणीसावा
भगवंत म्हणाले, हे सर्व जग मायामय असून मृगजळाच्या ठिकाणी पाण्याचा भास होतो तसेच जग खरे असल्याचा भास होतो. तू जन्ममरणाहून निराळा त्रिगुणांना न शिवणारा आणि खरोखर प्रपंचापासून अलिप्त आहेस. उत्पत्तीच्या आधी प्रपंच नसतो आणि अंतीही काही राहिलेला दिसत नाही. मध्यंतरी जो त्याचा भास होतो तोही मायामय असल्यामुळे मिथ्या होय. प्रपंचाच्या म्हणजे सृष्टीच्या आधी परब्रह्मच असते, अंतकालीही निरुपम असे तेच शिल्लक राहते आणि सृष्टीच्या स्थितिकालीसुद्धा ते ब्रह्मच असते. भ्रांति÷ लोकांना मात्र संसाराचा मिथ्या भ्रम होतो. हे उद्धवा ! याप्रमाणे आदी आणि अंती विचार केला असता ब्रह्म हेच सत्य असून, प्रपंच, जग हे खरोखरच मिथ्या आहेत आणि वेदशास्त्रार्थालाही हेच संमत आहे. अशी या प्रपंचाची कितीही घडामोड झाली व कितीही जन्ममरणाच्या कोटि गेल्या, तरी उद्धवा! त्यांचा तुला संपर्कही लागावयाचा नाही. कारण तू प्रवृत्ती व निवृत्ती ह्या दोन्ही तीरांपासून नित्यमुक्तच आहेस.
हे देवाचे भाषण श्रवण करून उध्दवाची खात्री झाली की, तो ब्रह्मरूप आहे. हर्षाने त्याच्या पोटांत आनंद मावेनासा झाला. त्याला राहावयाला ही सृष्टी पुरेनाशी झाली. ‘तू ब्रह्म आहेस’ असे श्रीकृष्णांनी म्हणताच त्या आनंदाच्या भरात उद्धव हर्षाने नाचू लागला. श्रीकृष्ण संतुष्ट होऊन आपल्या मुखानेच ‘तू पूर्ण ब्रह्म’ आहेस असे मला म्हणतोयस, तेव्हा आज मी धन्य धन्य होय. माझ्यासारखा भाग्यवान् कोण आहे ? असे मनात आणून उद्धवाने श्रीकृष्णाच्या चरणाला वंदन केले.
उद्धवाची भगवंतांवर प्रेमयुक्त भक्ती होती म्हणून तो प्रेमाने त्यास विचारू लागला. म्हणाला ! हे विश्वेश्वरा ! हे विश्वमूर्ते! आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसेच वैराग्य आणि विज्ञानाने युक्त अशा ज्ञानाचे वर्णन केले आता महापुरूष जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या भक्तियोगाविषयी मला सांगावे. जरी भगवंतांनी त्याला तू ब्रह्म आहेस असे म्हंटले असले तरी त्याचा साक्षात्कार कसा होईल ते त्याला भगवंतांच्याकडून जाणून घ्यायचे होते म्हणून तो म्हणाला, विश्वेश्वरा ! विश्वमूर्ते! विश्वंभरा श्रीकृष्णा ! ज्याच्या योगाने ब्रह्मसाक्षात्कार घडेल असे निश्चित ज्ञान मला सांगावे. कारण जे नुसते ज्ञान सांगतात पण त्यांना अनुभवाचा लेशही नसतो, ते केवळ मूर्ख होत असे मी समजतो. ह्याकरिता जीवाचे बंधन ज्याच्या योगाने तुटून जाईल अशी तीक्ष्ण वैराग्ययुक्ती मला सांगावी कारण ज्ञानाशिवाय वैराग्य हे आंधळे असते. ते खडकाबिडकावर जाऊन आदळते आणि वैराग्याशिवाय ज्ञान हे लंगडे असते. त्याला युक्ती कळते, पण त्याचा पुरुषार्थ मात्र काही चालत नाही.
ह्याकरितां विवेक आणि वैराग्य ही दोन्ही हृदयमंदिरात शिरतील, तरच विषयावस्था सोडून देऊन जीव हा ‘ब्रह्म ते मीच’ असे समजून वागू लागतो. ज्ञानाला जोपर्यंत विज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत जीवपणाचा निरास होत नाही. याकरिता जीवपण आणि शिवपण या दोहोंचंही निवारण करील, असे विज्ञान मला सांगावे. ‘ असंभावना’ दोष तिळमात्रही राहात नाही, त्यालाच ‘शुद्ध ज्ञान’ असे म्हणतात आणि ज्यात ‘विपरीत भावना’ मुळीच नसते, त्यालाच ज्ञाते लोक ‘विपुल’ असे म्हणतात.
असे जे अत्यंत शुद्ध व विपुल ज्ञान, त्याने युक्त असे वैराग्य आणि विज्ञान, त्यातही श्रे÷ असे तुझे भजन, याबद्दल मला कृपा करून सांग. तुझ्या श्रे÷ भक्तीसाठी मोठेमोठे साधुही शोधात पडले आहेत आणि जीवाभावाने धरणे धरून बसलेले असतात ती भक्ति मला सांगावी. तुझी उत्तम भक्ति केली असता त्रिविध तापही क्षयाला जातात आणि आपली मुक्ती आपल्या हाती लागते. म्हणून मी विनंती करीत आहे. हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे.
अशावेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. उद्धवाची ही विनंती खास संसारी सामान्यजनांना मोक्षसाधन कसे करावे हे कळण्यासाठी आहे.
क्रमशः