अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माझ्यामागे यादवांचा फार मोठा गोतावळा असतानाही तू मला एवढा प्रिय वाटतोस, याला तुझे माझ्यावरचे विलक्षण प्रेम कारणीभूत आहे. हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाने देवाच्या पायांना मिठी घातली. तेव्हा देवही अंतःकरणापासून अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी उद्धवाला तत्काळ आलिंगन दिले. हृदयात हृदय एकरूप झाले, देहात देहाला आलिंगन पडले, मनाशी मन एक झाले, तेव्हा आत्मानंद अगदी पूर्ण भरून वाहू लागला. देव देवपणा विसरले आणि भक्ताला भक्तपणा आठवेनासा झाला. आपण दोघे वेगवेगळे आहोत हे विसरून ते एकरूप झाले तेव्हा घनदाट आणि परिपूर्ण असे आनंदमय स्वरूप, ज्याला आदि, मध्य व अंतही नाही, ते मूर्तिमंतच प्रगट झाले.
परंतु देवांच्या परिपूर्णतेचे मोठे आश्चर्य आहे. त्यांनी तेथेही एक मोठा चमत्कार केला. तो असा की, उद्धवाचे, तो उद्धव असल्याचे भानही त्यांनी जाऊन दिले नाही. कारण ते मनात म्हणाले की, मला असा दुसरा भक्त मिळणार नाही. माझे हितगुज सांगावयाला मला उद्भवासारखा दुसरा कोण मिळणार? माझ्या मनातील ज्या गोड गोड गोष्टी आहेत त्या सावकाशपणाने मी कोणापाशी सांगाव्या? मी निजधामाला गेल्यानंतर माझे जे अपार आत्मज्ञान आहे, त्याला उद्धव हा एक योग्य साठा आहे. तोच तो जीवापाड जतन करून ठेवेल, म्हणून उद्धवाचे भान त्यांनी कायम ठेवले. उद्धव आत्मानंदांत निमग्न झाला होता, त्याला आपल्या हातांनी थोपटून श्रीकृष्णांनी सावध केले, तेव्हा त्याला आपण भक्त आहोत ही आठवण झाली आणि तो म्हणाला, “श्रीकृष्णनाथा! तुमचा जयजयकार असो. आता मला जे आत्मसुख दाखविलेत, ते सदोदित सर्वस्वी कायम राहील अशीच कृपा खरोखर तुम्ही करा. “ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “ उद्धवा! माझी सर्वस्वी कृपा तुझ्यावर आहेच कारण भक्ताच्या अनन्य प्रेमाला वश होऊन मी त्याच्या योगक्षेमाची सर्वतोपरी काळजी घेतो. त्यासाठी आवश्यक असेल तर मी चाकर होऊन त्याची सेवाही करतो. हा माझा गुह्य ज्ञानाचा गुप्त ठेवा आहे. तो मी तुला प्रेमाने सांगितला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ वेदाने सांगितले आहेत पण माझे जे गुह्यतम ज्ञान तुला सांगितले, ह्यालाच ‘पाचवा पुरुषार्थ’ असे नाव आहे. हे माझे गुह्यतम ज्ञान असल्याने मी प्रत्यक्ष सांगितल्याशिवाय ते कुणाला कळत नसल्याने ते वेदशास्त्रांनाही अगम्य व सर्व देवांना अत्यंत दुर्गम आहे. ज्याच्या योगाने मी पुरुषोत्तम लुब्ध होऊन जातो, ते हे भक्तप्रेमाचे रहस्य आहे. मला वश करून घेण्याचे वर्म हेच की, अंतःकरणात भक्तिप्रेम धरावे म्हणजे चारही मुक्तींचा भ्रम नष्ट होतो व पुरुषार्थकामही कमी होतो. ज्याला माझी सप्रेम भक्ती आहे, त्याचे एव्हढे महत्त्व आहे की, नुसते त्याचे नाव ऐकताच सर्व विघ्ने पळून जातात. त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गती प्राप्त करून देण्यास कोण समर्थ आहे?’’
ज्याला माझी अनन्यभक्ती असते, त्याच्यावर माझी पूर्ण कृपा असते. माझ्या भक्तांना माझ्याशिवाय दुसरी गती कधीच कल्पांतीही प्राप्त व्हावयाची नाही. वेदातील सर्व विधी हे लोकांना शिस्त लागावी, त्यांनी विषय बेताने भोगावेत म्हणून सांगितले आहेत पण माझे निष्काम भक्त हे माझ्याशिवाय इतर काही जाणतच नसल्याने ते विषयांपासून दूरच असतात. ते विरक्त असल्याने त्यांना वेदविधींची अडचण उत्पन होत नाही. त्यांना माझ्या कृपेचाच पूर्ण प्रसाद प्राप्त होत असल्याने त्यांना वेदविधी बाधक होत नाहीत. जे माझे सकाम भक्त असतात, त्यांना मी त्यांच्या भक्तीचे फळ जरूर देतो पण ते मी त्यांना अशासाठी देतो की, अशी फळे कायम टिकणारी नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे आणि मिळालेली फळे भोगल्यानंतर निष्काम व्हावे आणि शेवटी माझ्या निजधामाला यावे. कारण उद्धवा माझ्या भक्तांना दुसरी जागाच नाही. ज्याच्याजवळ माझे एकनि÷ भजन आहे, त्याच्या चरणाची सेवा स्वकर्म करते. विधिनिदर्शक वेद त्याच्या अंगणात उभे असतात. माझ्या भक्ताला माझ्यावाचून दुसरी जागा असत नाही.
क्रमशः