थॉमस चषक विजेत्या खेळाडूंच्या भेटीत केले कौतुक, महिला खेळाडूंचाही समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थॉमस चषक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाची तसेच उबेर चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या महिला बॅडमिंटनपटूंची रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा गौरव केला.
भारतीय पुरुष संघाने थॉमस चषक पहिल्यांदाच जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन करीत कामगिरीची प्रशंसा करून प्रत्येक खेळाडूशी सुसंवाद साधला होता. भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना आपल्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही दिले होते. येथील कौतुकसोहळय़ावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक भेट घेत त्यांच्याशी हितगुज केले. ‘राष्ट्राच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्ही मिळविलेले यश साधारण नसून तुम्ही हा पराक्रम साध्य करून दाखविला आहे. एकेकाळी आम्ही या स्पर्धेत खूप मागे होतो आणि अनेकजण त्याची फारशी दखलही घेत नसत. पण तुम्ही अभिमानास्पद कामगिरी करून या क्षेत्रातही आपली ताकद दाखवून दिली आहे,’ असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला त्यांनी पुन्हा एकदा अभिमानाने उजाळा दिला.
‘कित्येक दशकांत या स्पर्धेत भारताला तिरंगा फकडवता आला नव्हता, त्यामुळे या संघाने केलेली कामगिरी छोटी म्हणता येणार नाही. अनेकजण या स्पर्धेकडे दुर्लक्षच करीत होते. पण तुम्ही शानदार प्रदर्शन करीत 14 वेळचे चॅम्पियन इंडोनेशियाला धक्का देत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. आम्ही काहीही साध्य करू शकतो, ही मनोवृत्ती आता भारताची नवी ताकद बनली आहे. यापुढेही सर्व खेळाडूंना आवश्यक ती सर्व मदत व समर्थन दिले जाईल, याची मी हमी देतो,’ असे आश्वासनही पंतप्रधानांनी खेळाडूंशी बोलताना दिले. वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतचे त्यांनी खास अभिनंदन करून यश मिळवण्यासाठी त्याने घेतलेल्या पुढाकाराचे व जबाबदारीचे त्यांनी कौतुक केले.
‘असे कौतुक जगातील कुठल्याच खेळाडूला मिळाले नसेल, असे मी अभिमानाने सांगू शकतो. जेतेपद मिळाल्यानंतर लगेचच तुम्हाला भेटता आले, असे भाग्य फक्त आम्हालाच मिळालेय. तुमचा मी खूप खूप आभारी आहे, सर. आम्हाला पंतप्रधानांचे पाठबळ आहे, असे आम्ही सर्वजण अभिमानाने म्हणू शकतो,’ अशा भावना यावेळी किदाम्बी श्रीकांतने व्यक्त केल्या. पंतप्रधान खेळाडू व त्यांचा खेळ यांचा सतत पाठपुरावा करतात, त्यांचे विचार नेहमीच खेळाडूंशी जुळतात, असे मत प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले. दुहेरीचे प्रशिक्षक मथायस बोए म्हणाले की, ‘मी देखील खेळाडू होतो आणि अनेक पदकेही जिंकली आहेत. पण माझ्या पंतप्रधानांनी माझी कधीही भेट घेत असे कौतुक केले नाही,’ यावेळी युवा खेळाडू अल्मोराच्या लक्ष्य सेनने उत्तराखंडची सुप्रसिद्ध ‘बाल मिठाई’ पंतप्रधानांनी भेट दिल्यावर त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. स्पर्धा जिंकल्यानंतर लक्ष्य सेनशी संपर्क साधला, त्यावेळी बाल मिठाईची त्यांनी मागणी केली होती, ती लक्ष्यने या भेटीत पूर्ण केली. ‘खेळाडूंच्या अगदी लहानसहान गोष्टींवरही त्यांचे लक्ष असते, हे भारावून टाकणारे आहे. तुमच्याशी भेटणे, बोलणे हे आमच्यासाठी प्रेरणादायकच ठरते. आमच्याकडून यापुढेही अशीच यशस्वी कामगिरी होत राहील,’ अशा भावनाही लक्ष्यने व्यक्त केल्या.
‘पदकविजेते आणि पदक न मिळविणारे खेळाडू यांच्यात तुम्ही भेदभाव करीत नाही, हे मला खूप प्रेरणादायक वाटते,’ अशी भावना हरियाणाच्या उन्नती हुडाने व्यक्त केली. पदक जिंकल्यानंतर आम्ही सर्वचजण त्या दिवशी पदक जवळ घेऊनच झोपलो होतो, असे यावेळी दुहेरी स्पेशालिस्ट सात्विकसाईराजने सांगितले.