शुक्रवारपेठ-बुधवारपेठ कॉर्नरजवळ शेण-कचऱयाचे ढीगारे साचल्याने दुर्गंधी : मुख्य समस्यांचे निवारण होत नसल्याने निधी वाया गेल्यात जमा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बुधवारपेठ येथील बॅ नाथ पै उद्यान परिसरात विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. शुक्रवारपेठ-बुधवारपेठ कॉर्नरजवळ उद्यानाचा विकास करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र याच ठिकाणी शेण आणि कचऱयाचे ढीगारे साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का? अशी विचारणा नागरिक करीत आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या टिळकवाडी परिसरातील स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शुक्रवारपेठ रोडवर ठिकठिकाणी कचऱयाचे ढीगारे साचत आहेत. विशेषतः मंगळवारपेठ आणि बुधवारपेठ कॉर्नरजवळ शेणाचे ढीगारे साचले आहेत. तसेच या ठिकाणी परिसरातील रहिवासी कचरा टाकत असल्याने उद्यानाशेजारी आणि सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाले आहे.
खर्ची घालण्यात आलेला निधी देखील वाया
संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरल्याने ये-जा करणाऱया रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कचरा व शेणाचे ढीगारे हटविण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सुशोभिकरणासाठी कोटीचा निधी खर्च करून स्मार्ट सिटी बनविण्याकरिता प्रशासनाने आटापिटा चालविला आहे. मात्र ही योजना सर्वसमावेशक नसल्याने अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. मंगळवार पेठ परिसरात गवळी समाजाच्या लोकांची वस्ती पण विकासकामे राबविताना समाजाच्या अडचणीचा विचार करणे गरजेचे होते.
सुशोभिकरणासाठी निधीचा चुराडा
मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नाईलाजास्तव रस्त्या शेजारी शेणाचे ढीगारे जमा करावे लागतात. गवळी समाजाच्या अडचणींचा विचार करून त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. केवळ सुशोभिकरणासाठी कोटय़वधी निधीचा चुराडा करून स्मार्ट सिटी बनविण्यात येत आहे.
मात्र मुख्य समस्यांचे निवारण होत नसल्याने खर्ची घालण्यात आलेला निधी देखील वाया गेल्याची टीका नागरिक करीत आहेत.
आवश्यक उपाय योजना राबविण्याची मागणा
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. तसेच गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र अलिकडेच झालेल्या पावसामुळे शुक्रवारपेठेतील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे या परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या योजना अयशस्वी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासह स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.