पथदीप दुरुस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष : नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पथदीपांच्या देखरेखीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र पथदीपांची देखरेख केली जात नसल्याने गणपती मंदिर ते गणेश नगरपर्यंतच्या सहय़ाद्रीनगर रोडवरील पथदीप गेल्या दोन महिन्यापासून बंद आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता पथदीपांची दुरुस्ती तातडीने करण्यात आली नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मिलिटरी विनायक मंदिर ते सहय़ाद्रीनगरपर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप दोन महिन्यापासून बंद आहेत. याबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही. शहरातील पथदीपांच्या देखरेखीसाठी महापालिका कोटीचा निधी खर्च करते. मात्र पथदीपांची अवस्था पाहता इतक्या निधीचे काम होते का याची चौकशी करण्याची गरज आहे.
पथदीप सुरू असणे आवश्यक
मागील वर्षी केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाऊसही मोठय़ाप्रमाणात असल्याने खड्डय़ामध्ये पाणी साचले आहे. अशातच पथदीप बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणपती मंदिर ते सहय़ाद्रीनगरपर्यंतच्या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांना ये-जा करणे मुष्कील बनले आहे.
या भागात नोकरवर्ग अधिक असल्याने विशेषतः सायंकाळनंतर नागरिक येत असतात. तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सायंकाळी उशिरा येत असतात. यामुळे येथील पथदीप सुरू असणे आवश्यक आहे. पण पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून, रात्रीच्यावेळी अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे.
पथदीप केवळ शोभेच्या वस्तू
अलीकडेच स्मार्टसिटी योजनेअंतर्गत नवीन पथदीप खांब, पथदीप आणि फुटपाथवरील दिवे बसविण्यात आले आहेत. पण यापैकी निम्या रस्त्यावरील पथदीप सुरू असून उर्वरित पथदीप बंद आहेत. या रस्त्यावर झाडे वाढली असल्याने खूप अंधार पसरलेला असतो. नव्याने बसविलेले फुटपाथवरील दिवे अद्याप सुरू झाले नाहीत. त्यामुळे परिसरात पथदीप केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. तक्रार करूनदेखील महापालिकेकडून कंत्राटदारावर कारवाई केली जात नसल्याने कंत्राटदाराचे फावले आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याकडे कंत्राटदाराने कानाडोळा केला असल्याची टीका होत आहे. याची दखल महापालिका आयुक्त घेतील का असा सवाल नागरिक करीत असून कंत्राटाबाबत चौकशी करावी अशी मागणी होत आहे.