साधारण 22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच सूर्याची किरणे लांब लांब पडायला लागतात. मोठय़ा पावलाने मोठा दिवस घेऊन पृथ्वीवरती येतो. अशा या सूर्याचं नेमकं महत्त्व काय? ‘सूर्य काही करत नाही आणि सूर्याशिवाय काही होतच नाही’ अशी आमची अवस्था. या सूर्यवंशाचं नाव धारण करणारा प्रभू श्रीराम नेमका त्याच्यासारखा कसा होता याचे उदाहरण रामचरितमानसामध्ये फार सुंदर आलंय.
‘बरसत, हरषत सब लखे करशत लखे न कोय
तुलसी प्रजा सुभाग से, भूप भान सो होय’
सूर्यवंशातला राजा हा सूर्यासारखा तेजस्वी आहे, पण तो सूर्यासारखा आपल्याकडून बरंच काही वसूलही करून जात असतो. म्हणजे आपल्याकडून टॅक्स घेत असतो. सध्या आपण सगळे जीएसटी लागला म्हणून आरडाओरडा करतो पण असा जीएसटी प्रत्येक गोष्टीवर रामायण काळातसुद्धा होताच. फक्त तो अप्रत्यक्षरीत्या घेतला जायचा, म्हणजे सूर्य पृथ्वीवरून टॅक्स गोळा करतो तसा. याचा अर्थ सूर्य तलावाच्या पाण्याची वाफ करून घेऊन जातो, वृक्षांची पानगळती करतो व मातीला चांगले खत मिळवून देतो. पावसाचे पाणी देत असला तरी पुन्हा काढूनही घेतो, असे अप्रत्यक्ष कर सूर्यासारखे रामाच्या राज्यातसुद्धा होतेच याचं उदाहरण पुढच्या ओळींमध्ये पाहायला मिळते………. ‘मणी माणिक मेहेगे कीये सहज त्रीण जल, अनाज. तुलसी सब जानीए…….. या राज्यात गरिबांना लागणाऱया सगळय़ाच गोष्टी अतिशय स्वस्त ठेवलेल्या होत्या तर श्रीमंतांना लागणारे हिरे मोती मात्र खूप महागडे केलेले होते. असा हा सूर्यवंशी राजा म्हणजेच श्रीराम याचा वनवासाचा काळ म्हणजे उत्तरायण. या काळातली पानगळ आपल्या जन्मस्थळी म्हणजेच पूर्वपदाला मातीवरती येऊन पडते. रामाच्या वनवासाला जणू पाठिंबा दाखवायला हे वृक्ष पर्णहीन होतात. एखादा वृद्ध मृत्यूसमयी वृद्ध अवस्थेमध्ये कमरेमध्ये वाकतो आणि जमीन निरखून पाहत असतो. म्हणजेच पुन्हा आपल्या बाल्यावस्थेकडे तो यायला लागलेला असतो. आणि आपण ज्या माती वरती उभे राहिलो आहोत ती मातृभूमी पुन्हा पुन्हा तो निरखत असतो. या उत्तरायणात बोराचं आणि उसाचं महत्त्व मोठे. या उसाचा कोणताही भाग वाया जात नाही. त्याच्यापासून पुन्हा पुन्हा आपल्याला काही ना काही मिळवता येते. राम कथेमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जण काही ना काही उत्तम काम करून गेलाय. बोरं कुठेही येणारं झाड. शबरीची मायेनं चाखलेली बोरं रामाला आवडली पण लक्ष्मणाने मात्र ती बी थेट हिमालयात भिरकावून दिली, तिचं रुपांतर संजिवनी बुटीत झालं अन् नंतर त्याच्याच उपयोगी पडलं. उत्तरायण म्हटलं की भिष्माचा मृत्यू आठवतो. या पर्वकाळात मृत्यू म्हणजे परब्रह्मात विलीन होणं. या काळात दानधर्म देखीलमहत्त्वाचा, खऱया अर्थाने वाण वाटायचे असते …आम्ही फक्त शब्दांची वाणं वाटत निघालोय…..