अध्याय विसावा
भगवंत म्हणाले उद्धवा, योगसाधन व स्वरूपाचा शोध या दोन्हीव्यतिरिक्त आणि सुलभ असे साधन म्हणजे माझी भक्ती. त्याबद्दल सविस्तर सांगतो. माझ्या मूर्ती अत्यंत प्रीतीने पूजल्या असता मी संतोष पावतो. माझे गुणानुवाद श्रवण करावेत, माझे कीर्तन करावे, माझे नामस्मरण करावे, माझेच ध्यान, माझेच भजन, असे सदासर्वदा माझेच चिंतन करीत असावे. पायांनी प्रदक्षिणा घालावयाच्या किंवा यात्रेला जावयाचे.
अष्टांगांनी सर्वकाल मलाच नमन करावयाचे. अशा रीतीने अनन्यभावाने माझे भजन करून, माझ्याच भक्तीमध्ये गढून जावयाचे. असे माझ्या भक्तीमध्ये जे निमग्न होतात, त्यांना मी चक्रपाणी विकला जातो. त्याच्याहून दुसरे कोणी आवडते असे मला त्रिभुवनात नाही. मी भक्तीशिवाय दुसऱया कशानेच सांपडावयाचा नाही. माझ्या भक्ताच्या हातून निंद्य कर्म घडत नाही. कारण, त्याचे मागेपुढे रक्षण करणारा मी असतो. तेव्हा ते निंद्यकर्म योगाकडे येते. अशावेळी त्याने सावध मन करून योगयुक्त होऊन योगबळानेच साऱया पातकांचे क्षालन करावे. हेच योग्याला प्रायश्चित्त होय. लक्ष लावून माझे एक अर्ध क्षण ध्यान केले, तर कोटय़वधी पातकांचे भस्म होऊन जाते.
वेदांनी किंवा शास्त्रांनी प्रेरणा केल्याशिवायच मनुष्यांची स्वाभाविकपणेच विषयात प्रवृत्ती असते. तिची निवृत्ती करण्यासाठीच माझी वेदोक्ती प्रगट झाली आहे. विषय एकदम टाकून देण्याला लोक असमर्थ असतात, त्यांना विषय सोडण्यासाठीच वेद त्यांच्यांतील गुणदोष दाखवून देतो. त्यामुळे व्यभिचाराला आळा बसतो. कसे ते सांगतो. ही आई, ही बहीण, ह्यांच्याशी व्यभिचार करू नये. हे अधिकार वेदाने जर सांगून दिले नसते, तर विषयाच्या संबंधांत हवा तसा व्यवहार झाला असता कारण समाजात जोपर्यंत स्त्री-पुरुष व्यक्ति आहेत, तोपर्यंत कामसंचार हा असणारच! मी जर वेदोक्तीने नियम करून दिला नसता तर अतोनात व्यभिचार माजला असता. विवाहाकरता इतर वर्णाच्या स्त्रिया वर्ज्य करून सुयोग्य वयाची व आपल्याच जातीची स्त्री असेल, तिच्याशी विवाह करावा. अग्नि व ब्राह्मण यांना साक्षी ठेवून तिचे वेदोक्त रीतीने पाणीग्रहण करावे आणि मग इतर स्त्रियांविषयी शपथ वाहून, यथाविधीने स्वपत्नीशीच रममाण व्हावे. ह्याप्रमाणे सारे लोक स्त्रीभोगाविषयी अत्यंत आसक्त असलेले पाहून वेदोक्तीने स्वदारागमन हेच सर्वांना योग्य असे ठरवले
आहे.
ह्याचप्रमाणे मी अन्नसंपर्क कसा करावा, कोणाशी करावा, ह्याचाही वेदमुखाने लोकांना नियम लावून दिला. नाही तर वेदाशिवाय सारा वर्णसंकरच माजून राहिला असता. तो वर्णसंकर चुकविण्यासाठी व विषयप्रवृत्ती टाळण्यासाठीच खरोखर वर्णाश्रमाचा प्रकार वेदाने सांगितला. उद्धवा! विषयांची जी प्रवृत्ती तीच खरोखर ‘अविद्याबाधा’ आणि विषयांची अत्यंत निवृत्ती तीच ‘मुक्ति’ होय. वेदाने विषयांची निवृत्ती करण्याकरिताच कर्मप्रवृत्ती दाखवून दिली.
वर्णाश्रमाच्या आचाराची स्थितीही विषयासक्ती नाहीशी करणारीच आहे. नित्य नैमित्तिक इत्यादि कर्मतंत्र व गुणदोषांचे नाना प्रकार वेदाने वर्णन केले आहेत, ते मनुष्याला विरक्ति प्राप्त व्हावी म्हणूनच केले आहेत.
स्वकर्माने चित्तशुद्धी होते व त्यामुळे खरेखुरे वैराग्य प्राप्त होते आणि ते विषयेच्छेचा नाश करून गुणकार्याची उपाधी जे रज-तम त्यांनाही आळा घालते. तेव्हा शुद्ध सत्त्वगुणच शिल्लक राहतो आणि त्यामुळे गुरुभजनाचा छंद लागून ज्ञान-विज्ञान घरात शिरते. पूर्ण भगवद्भक्ति करावी, तेव्हाच गुरुभजनाचा अधिकार प्राप्त होतो. सद्गुरुचा महिमा किती सांगावा? मी गुरुचा आज्ञाधारक आहे. गुरु ज्याच्यावर अनुग्रह करतो, त्याचा मी भगवंत उद्धार करतो. त्याला मोठय़ा आवडीने मस्तकावर घेऊन आपल्या ऐश्वर्यावर बसवितो. गुरु हाच परमात्मा व परमेश्वर आहे असा ज्याचा विश्वास असतो, त्याचा, जगाचा जगदीश जो मी श्रीकृष्ण, तो अंकित होऊन राहतो.
क्रमशः