ओणी-अणुस्कुरा रस्त्यावरील खड्ड्यात रूतले वाहन
राजापूर/प्रतिनिधी
गतवर्षी पावसाळ्यात नादुरूस्त झालेल्या ओणी-अणुस्कुरा मार्गाची दुरूस्ती रखडल्याने यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर तात्पूरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात पुन्हा एकदा या रस्त्याची
दुरावस्था झाली आहे. रस्त्यात वाहने रूतून अपघात होण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी रायपाटण येथे एक अवजड वाहन रूतल्याने या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोकणातून कोल्हापूरला जाण्यासाठी जवळचा आणि सुरक्षित घाट म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत आंबा घाटासह अन्य घाटात झालेल्या पडझडीनंतर त्या घाटमार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती आणि ती अणुस्कुरा मार्गे वळवण्यात आली होती.
त्यामध्ये अवजड वाहनांचा देखील सामावेश होता. अचानक वाढलेल्या वाहतुकीमुळे ओणी-अणुस्कुरा या संपूर्ण मार्गाची चाळण झाली होती. त्यानंतर शासनाकडून त्या मार्गाच्या दुरूस्तीसाठी 7 कोटी 44 लाख रूपये मंजुर झाले.
हे ही वाचा : Ratnagiri : गणेशोत्सवात रोहा-चिपळूण मार्गावर ३२ मेमू धावणार
मात्र पण उन्हाळा संपला तरी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. पावसाळा सुरु होत असताना मार्गावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले. सुरूवातीला अणुस्कुरा घाटातील खड्डे भरल्यानंतर पाचल, रायपाटण परीसरातील काही ठिकाणचे खड्डे बुजवले गेले उर्वरीत भागातील खड्डे तसेच आहेत. दरम्यान अणुस्कुरा घाटातील पडलेले खड्डे भरण्यात आले असले तरी घाटमार्गे पुन्हा अवजड वाहतूक सुरु झाल्याने पुन्हा मार्ग धोकादायक बनला आहे.