पुणे / प्रतिनिधी :
सातारा जिल्हय़ातील पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्हय़ात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समाजमाध्यमातून आक्षेपार्ह संदेश, तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
सातारा जिल्हय़ातील पुसेसावळी गावात दोन गटात झालेल्या दंगलीत दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सातारा जिल्हय़ात तणाव निर्माण झाला असून, साताऱ्यासह लगतच्या जिल्हय़ांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्हय़ातील घडामोडींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले असून, ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्हय़ातील 200 हून जास्त संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.