जूनपासून सर्वत्र होणार कडक अंमलबजावणी : पाचशेपासून दहा हजारपर्यंत बसणार फटका : वाहनचालन परवाना रद्दतेसह होऊ शकते जेल
प्रतिनिधी / पणजी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड पडणार आहे. मोटर वाहन कायद्यांतर्गत केंद्र सरकारने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंड रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. येत्या 1 जून पासून राज्यात त्याची कडक अमंलबजावणी होणार आहे. वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास करीत असल्यामुळे आणि वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहन अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहन अपघातात होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही नियमितपणे वाढ होत आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे या उद्देशाने दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
मोबाईल वापरणाऱ्यास मोठा दंड
वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पहिल्यांदा एक हजार ऊपये दंड दिला जाईल. तोच चालक दुसऱ्यांदा वाहन चालविताना मोबाईलचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्याला दहा हजार ऊपयांपर्यत दंड दिला जाईल.
हेल्मेट न वापरल्यास एक हजार दंड
ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा 500 ऊपयांपर्यंत आणि दुसऱ्यांदा एक हजार ऊपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांना एक हजार ऊपये दंड देण्यात येईल. अती वेगाने वाहन चालविणाऱ्यांना एक ते दोन हजार ऊपयांपर्यंत दंड दिला जाईल.
आपत्कालीन वाहनांना वाट न दिल्यास दहा हजार दंड
आपत्कालीन वाहनांना वेळीच वाट न दिल्यास दहा हजार ऊपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. चुकीच्या जागी वाहन पार्क केल्यास 500 ते 1 हजार ऊपयांपर्यंत दंड दिला जाईल. दुचाकीवर तीन व्यक्ती असल्यास एक हजार ऊपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक केल्यास 500 ते एक हजार ऊपयांपर्यंत दंड दिला जाईल. मालवाहक वाहनातून प्रवाशाना नेल्यास 500 ते एक हजार ऊपयांपर्यंत दंड दिला जाईल. फॅन्सी नंबरप्लेट असल्यास 500 ते एक हजार ऊपयांपर्यंत दंड देण्यात येईल. याशिवाय सिग्नल तोडल्यास, अती वेगाने वाहन चालविल्यास, क्षमतेपेक्षा जादा सामान भरल्यास, तसेच मद्यपान करून वाहन चालविल्यास मोठा दंड दिला जाईलच त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तीन महिन्यासांठी वाहनचालन परवाना रद्द केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.