तृणमूल कार्यकर्त्यांचा रस्तारोको : 100 पेट्रोल बॉम्ब फेकले
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी स्थानिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर उमेदवारांना 15 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेदरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात मंगळवारी तृणमूल काँग्रेस आणि आयएसएफच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीदरम्यान तृणमूल कार्यकर्त्यांनी 100 हून अधिक पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप ओ.
इंडियन सेक्युलर फ्रंटचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी जात असताना त्याला रोखण्यात आल्याने वाद सुरू झाला. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांवरच बॉम्ब फेकण्यात आले. यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा वापर करावा लागला. राज्यातील हिंसक स्थिती पाहता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची समीक्षा करण्यात आली. तसेच निवडणुकीसंबंधी विविध पक्षांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या.
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणे योग्य ठरले असते. आता बैठकीमुळे कुठलाच फायदा होणार नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी केला आहे. तर माकपचे नेते सुजान चक्रवर्ती यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राज्यात शांततापूर्ण निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे, हिंसक घटना केवळ काही भागांमध्ये घडल्याचा दावा राज्यातील सत्तारुढ पक्ष तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केला आहे.
उच्च न्यायालयात सुनावणी
बंगालमधील स्थानिक निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीसंबंधी कलकत्ता उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. न्यायायाने 8 जुलै ऐवजी 14 जुलै री मतदान करविण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 जूनपासून वाढवत 18 जून करण्याची आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जूनपर्यंत करण्याची सूचना न्यायालयाने आयोगाला केली आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
काँग्रेस अन् भाजपकडून याचिका
बंगाल स्थानिक निवडणुकीची घोषणा झाल्यावर कलकत्ता उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. स्थानिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जारी अधिसूचनेच्या काही हिस्स्यांना या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यातील एक याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तर दुसरी याचिका शुभेंदु अधिकारी यांनी दाखल केली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या
बंगालमध्ये स्थानिक निवडणुकीपूर्वी मुर्शीदाबाद येथे एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना राज्यपालांना पत्र लिहून राज्यात सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने देखील राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांची भेट घेत हीच मागणी केली आहे. तर हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तृणमूल कार्यकर्ता बशीर मोल्लाहला अटक केली, त्याच्याकडून एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे.