पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक पुढाकाराने ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ नव्यानेच सुरू करण्यात आली आहे. आपल्या नावाप्रमाणेच कौशल्यपूर्ण असणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कौशल्यावर आधारित रोजगार स्वयंरोजगारासाठी मिळणारे आर्थिक सहाय्य हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्या असून त्याचे समाजातील गरजू व होतकरु उमेदवारांना मिळणारे फायदे दूरगामी स्वरुपाचे ठरणार आहेत.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची पार्श्वभूमी म्हणजे सद्यस्थितीत भारतात ग्रामीण व परंपरागत आणि कसबी कारागिरांसह युवा, पुरुष, महिलांची संख्या लक्षणीय स्वरुपात आहे. आपापल्या कौशल्य-कारागिरीसह पिढीजात वा परंपरागत स्वरुपात मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वा असे काम करू इच्छिणाऱ्या कसबी व हुन्नरी कारागिरांना ‘विश्वकर्मा’ असे संबोधून या नव्या योजनेत समावेश करण्यात आल्याने योजनेची व्यापकता व उपयुक्तता वाढली आहे.
‘विश्वकर्मा’ ही सर्व कौशल्ययुक्त व विविध आयुधांसह विश्व निर्माणासाठी सिद्ध असणारी श्रम आणि श्रमिकांची देवता. त्यामुळेच या योजनेत ग्रामीण व कृषीशी निगडित व्यवसाय व अर्थ व्यवस्थेवर आधारित अशा 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुतार व्यवसाय, बोटी बनविण्याचा व्यवसाय, धातू काम, लोहार, लोखंड काम, ठोक काम व साधनांची निर्मिती करणारे, कुलूपे बनविणारे कारागीर, सोनारकाम-सोनार, मातीकाम-कुंभार, शिल्पकाम-दगड फोडण्याचा व्यवसाय करणारे शिल्पकार, मूर्तीकाम व पाथरवट कारागीर, चांभार-चर्मकार व पादत्राणे बनविणारे, गवंडी काम-राजमिस्त्री, टोपल्या-परड्या, केरसुणी वा झाडू बनविणारे, पारंपरिक स्वरुपातील बाहुल्या व खेळणी बनविणारे, केशकर्तन कारागीर-न्हावी, फुलांचा व्यवसाय करणारे माळी, कपडे धुण्याचा व्यवसाय करणारे धोबी, शिंपीकाम करणारे दर्जी व माशांच्या जाळी बनविण्याचा व्यवसाय करणारे कोळी व मत्स्य व्यवसायिक इ. कारागिरी व ग्रामीण व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता- ‘विश्वकर्मा’ म्हणून योजनेत समाविष्ट होण्यासाठी उमेदवार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
उमेदवारांकडे त्यांच्या स्वत:च्या कौशल्यासह कौटुंबिक स्वरुपात व परंपरागत पद्धतीने वर नमूद केल्यापैकी कुठल्याही एका कौशल्यावर आधारित व असंघटित क्षेत्रातील काम करण्याचा प्र्रत्यक्ष अनुभव असायला हवा.
अर्जदार कुटुंबातील कुणा एकालाच विश्वकर्मा योजनेचा आर्थिक लाभ मिळू शकेल.
योजनेंतर्गत लाभार्थी- उमेदवाराचे वय कमीतकमी 18 वर्षे असायला हवे.
अर्जदारांनी केंद्र वा राज्य सरकारांतर्फे उपलब्ध असणाऱ्या या अथवा या सारख्या कुठल्याही अन्य आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
सरकारी नोकरीत असणारे वा त्यांच्यावर अवलंबून असणारे उमेदवार योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
नोंदणी पद्धती- ‘विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवार- अर्जदारांनी त्यांच्या आधारकार्डासह व बायोमेट्रिक पद्धतीने पीएम विश्वकर्मा पोर्टलद्वारे व सार्वजनिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून करायला हवी.
अर्जदारांची छाननी- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज व त्यांच्या तपशिलाची छाननी ग्राम पंचायतीचे सरपंच वा नगरपंचायत अथवा नगरपरिषदेच्या अध्यक्षांद्वारे करण्यात येईल.
वरील छाननीच्या आधारे विश्वकर्मा योजनेच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीतर्फे पात्रताधारक उमेदवार-अर्जदारांची अंतिम निवड सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्रालय व संबंधित जिल्हास्तरीय अग्रणी बँक यांच्यातर्फे राज्य पातळीवर केली जाईल, असे या योजनेचे स्वरुप आहे.
योजनेची अंमलबजावणी- वर नमूद केल्याप्रमाणे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी ही केंद्रिय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय व कौशल्य विकास आणि उद्योजगता विभाग यांच्या संयुक्तवतीने केली जाणार आहे.
विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये त्रिस्तरीय पद्धतीचा अवलंब केला जाईल. या तीन टप्प्यांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवरील अंमलबजावणी प्रक्रियेचा समवेश असेल. या त्रिस्तरीय समित्यांचे स्वरुप म्हणजे देश पातळीवरील सर्वोच्च समिती, राज्यस्तरीय निरिक्षण समिती व प्रत्यक्ष म्हणजे जिल्हा पातळीवरील जिल्हा अंमलबजावणी समिती राहील. याशिवाय योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने व प्रभावीपणे करण्यासाठी संगणकीय ‘ऑन लाईन’पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात नागपूर येथे 18 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रिय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्वकर्मा दिनाच्या मुहूर्तावर झाली आहे. या नव्या योजनेच्या महत्त्वाकांक्षी अंमलबजावणीसाठी 2023-24 ते 2027-28 या कालावधीसाठी 13,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, हे उल्लेखनीय आहे.
योजनेचे मुख्य फायदे- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये संपूर्णपणे सहभागी होणाऱ्यांना योजनेंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र व विशेष ओळखपत्र देण्यात येईल.
याशिवाय योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना विविध टप्प्यांवर व आवश्यक ती कौशल्यपात्रता पूर्ण केल्यावर 15000 रु.ची अवजार राशी, मुलभूत कौशल्य प्रशिक्षण कालावधीत दररोज 500 रुपयाचे पाठ्यावेतन, कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांसाठी 1 लाख रुपयांचे व 18 महिने काळात परतफेडीसह असणारे कर्ज, मुलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर प्रगत कौशल्य प्रशिक्षणासाठी दररोज 500 रुपयाचे विशेष पाठ्यावेतन, प्रगत कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्यांना 2 लाख रुपयांचे व 30 महिने परतफेड कालावधीसाठी उपलब्ध असणारे विशेष कर्ज, संगणकीय पद्धतीने अधिकाधिक आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन राशी देण्यात येईल. विक्री व्यवस्था सहयोग- विश्वकर्मा योजनेतील लाभार्थींना त्यांच्या गरजा व आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा, कारागिरी, उत्पादन इ. ची गुणवत्ता प्रमाणपत्र, दर्जास्तर, विक्री व्यवस्थापनाला चालना, ई कॉमर्स पद्धतीने प्रत्यक्ष व थेट वितरण, ग्राहक संपर्क, वसुली जीईएम पोर्टलवरील संगणकीय व्यवहार, जाहिरात व प्रसिद्धी इ. संदर्भात विविध संस्था व संबंधित क्षेत्रातील विषयतज्ञांद्वारा मार्गदर्शन केले जाणार असून त्यामुळे विश्वकर्मा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला मोठे पाठबळ लाभणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर