सलग दोन दिवस एकाच ठिकाणी वीज कोसळल्यामुळे घबराट
वार्ताहर /जांबोटी
ओलमनी परिसरात गेल्या तीन दिवसापासून मेघगर्जनेसह दुपारच्यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. विजेचा चमचमाट तसेच मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. मंगळवारी, बुधवारीही जोरदार पाऊस झाला. यावेळी ओलमनी येथील विठ्ठल-रुक्माई व कालिकादेवी मंदिराच्या कळसावर वीज कोसळून दोन्ही मंदिरांच्या कळसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. सलग दोन दिवस एकाच ठिकाणी वीज कोसळल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. एक वर्षांपूर्वी या मंदिरांचे उद्घाटन करण्यात आले होते. मंदिरामुळे गावच्या वैभवात भर पडली होती. कळस बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, दोन्हीही मंदिरांच्या कळसावर वीज पडल्यामुळे कळसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी वर्गांना दिलासा जांबोटी, ओलमणी परिसरात दमदार वळीव पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे. या परिसरात एप्रिलच्या प्रारंभी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. सध्याच्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळणार आहे पाण्याअभावी वाळून जाणाऱ्या मिरची, ऊस पिकाला सध्याचा पाऊस वरदान ठरला असून, या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे.