वृत्तसंस्था / चंदीगढ
आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आपल्या कामगिरीच्या आधारावरच मते मागणार आहे. या पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी हे विधान शनिवारी केले. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही राज्याचा विकास झपाट्याने केला आहे. अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. या कामांमुळे जनतेची मोठी सोय होत असून जनता आमच्याच पाठीशी राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या 113 पैकी 93 जागांवर आम आदमी पक्षाचा विजय झाला होता. या पक्षाने काँग्रेसचा पराभव करुन सत्ता हस्तगत केली होती. दिल्लीतही याच पक्षाचे सरकार आहे. शनिवारी मान यांनी आपल्या पत्नीसह अमृतसर येथील सुवर्णमंदीरात जाऊन दर्शन घेतले आणि प्रार्थना करुन लोकसभा निवडणूक प्रचाराचा आरंभ केला आहे. या राज्यात लोकसभेच्या 13 जागा असून त्या सर्व जिंकण्याची आमची क्षमता आहे, असा दावा त्यांनी केला. दिल्ली, गुजरात, गोवा आदी राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने काँगेसशी युती केली असली तरी, पंजाबमध्ये मात्र, हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.