यंदा पावसाचे आणि चक्रीवादळाचे भाकीत आणि अलनीनोची दहशत यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासन काळजीत पडले आहे. उजनी, कोयना या धरणांसह महाराष्ट्रातील अन्य धरणे तळाला गेली आहेत. सात जून उजाडला अजून पाऊस नाही की पेरणी नाही. ओघानेच येत्या पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर ‘पाणीबाणी’ची स्थिती ओढावेल अशी स्थिती आहे. महापुराच्या भितीने धरणे मोकळी करा असा एकीकडे आग्रह तर मान्सून लांबला, पाणी संपत आले आता कसे अशी भिती त्यामुळे सारेच अडचणीत, संकटात धास्तावले आहेत. पर्जन्यतज्ञ आणि धरण विसर्गतज्ञ यांनी याबाबतीत पावले उचलली पाहिजेत पण सारे निर्णय राजकीय पातळीवर आणि मतपेटीवर डोळा ठेऊन घेतले जात आहेत. ओघानेच आगामी आठवड्यात पाऊस आला नाही आणि धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाणीसाठा आवक झाला नाही तर दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक जिह्यांना पाणी टंचाईची झळ बसणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. यंदा पुरेसा पाऊस नाही इथंपासून रग्गड पाऊस पडणार इथंपर्यंत अनेक अंदाज आले आहेत. सोशल मिडियावर तर स्वयंघोषित हवामान व पर्जन्यतज्ञ रोज वेगवेगळी भाकीते व्यक्त करत आहेत आणि बळीराजाची नजर आभाळाकडे लागली आहे. यंदा राज्यात अशी अनेक गावे आहेत तेथे एकही वळवाचा अथवा मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. मान्सून हा भारतीयांसाठी वरदान आहे. दरवर्षी एक जूनच्या दरम्यान अंदमान, चार जूनला केरळ किनारपट्टी आणि सात जूनला महाराष्ट्रात, गोव्यात पावसाचे आगमन होते. शास्त्रात खूप प्रगती झाली आहे आणि हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे पाऊस बेभरवशाचा झाला आहे. कोसळला म्हणजे ढगफुटी आणि नाही म्हणजे जमिनीला भेगा अशी स्थिती आहे. माणसेच त्याला कारणीभूत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी योग्य व परिणामकारक प्रयत्न नाहीत. जोडीला कार्बन उत्सर्जनामुळे निसर्गाचा ऱ्हास झाला आहे. जागतिक तापमान परिषदेत जाणकारांनी विविध इशारे दिले असले तरी माणसे, सरकार जागे होत नाहीत. हात-पाय हालवत नाहीत हे दुर्दैव आहे. वसुंधरादिन, पर्यावरणदिन वगैरे नुसते सोहळे झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही पण वनविभागाने सोमवारी रोपे वाटली आता ही रोपे कोण कोठे लावणार आणि ती कशी जगवणार हा प्रश्नच आहे. दरवर्षी तोच ख•ा, तसेच झाड, तोच फोटो, खर्चाची बिले मात्र नवी हा धंदा अनेक वर्ष होतो आहे. ओघानेच पाणीबाणी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर या संकटांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. कार्बनचे उत्सर्जन थांबले पाहिजे. राखीव वनक्षेत्रे जपली पाहिजेत. वाढवली पाहिजेत. जोडीला पाण्याचा, पावसाचा योग्य वापर केला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश वसंतदादा पाटील यांनी ऐंशीच्या दशकात दिला होता. तो अंमलात न आल्याने व विकासाच्या आणि विस्ताराच्या नावाखाली जे उद्योग सुऊ आहेत ते रोखले न गेल्याने अशी वेळ येत आहे. तापमान 40, 45, 48 अंशापर्यंत वाढत आहे. पण माणसे शहाणी होत नाहीत आणि सरकार मंत्रीमंडळात विस्तार आणि शिंदे-मिंदे, खोकी यातच दंग आहे. सात जून ही मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख पण सात जूनला आभाळ आग ओकत आहे व पावसाळा आला याचा मागमूस नाही. शेतकऱ्यांची नांगरट केलेली शेते एकही वळीव नसल्याने ढेकळं फुटली नाहीत अशा स्थितीत आहेत. तिफणी चालवायचे, ज्वारी, सोयाबिन, मका, उडीद, भुईमूग अशी खरीप पिके पेरण्याचे दिवस पण सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत आणि हवामान तज्ञ यंदा मान्सून दहा-पंधरा दिवस लांबणार असे भाकित सांगत आहेत. जोडीला कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा अशीही भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात उजनी पाणीसाठा शुन्यावर गेला आहे. कोयनेत केवळ आठ टक्के पाणी आहे. पानशेत 14 टक्के, काळम्मावाडी दोन टक्के पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेती व वीज निर्मितीसाठी लागते. येत्या चार दिवसात पाऊस न आल्यास राज्याला मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार अशी भीती आहे. पाणीबाणी नंतर उपसाबंदी, वीजनिर्मितीवर परिणाम, शेती हंगामावर परिणाम अशी संकटाची मालिकाच तयार होते. ऊन, उष्णता जोरात असल्याने बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होते. एकूणच पाऊस लांबला तर या विचाराने सर्वांची झोप उडाली आहे. उजनी धरण मृत साठ्यावर गेल्याने मराठवाडा आणि सोलापूर वगैरे परिसर चटके सोसतो आहे. पाणीबाणी येऊ नये यासाठी धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत. नवीन काही धरणे बांधता येतील का, वनक्षेत्र वाढवण्यासाठी हमखास काही प्रयत्न करता येतील का? याचा विचार कऊन, कृती कार्यक्रम आखणे व राबवणे गरजेचे आहे. आपण अवकाशात अनेक उपग्रह सोडले आहेत. हे उपग्रह वेगवेगळी माहिती, चित्र आणि पर्यावरण संदर्भात माहिती देत असतात. या माहितीचा अभ्यास कऊन पावसाचे, विजेचे, चक्रीवादळाचे अचूक भाकीत झाले पाहिजे आणि सरकारतर्फे ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तात्काळ पोहोचले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही आणि हवामानशास्त्राचे एकमतही नसते. त्यामुळे भितीच्या वाकुल्या पाठ सोडत नाहीत. पंढरीची वारी सुऊ झाली आहे. सात जूनची तारीख मागे पडली आहे. काहींनी भाताच्या धुळवाफ पेरण्या केल्या त्यांना फेरपेरणीचे संकट सामोरे आहे. बळीराजा पंढरीच्या पांडुरंगाला चांगला पाऊस दे अशी विनवणी करतो आहे. पण नमनाला संकट दिसू लागल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. पाणीबाणी जाहीर करावी लागेल अशी भीती आणि स्थिती आहे. पण राजकारण मंत्रीमंडळ विस्तारावर नजर रोखून बसले आहे. कुणाला संधी, कुणाला डच्चू यातच धन्यता मानली जाते आहे. शेती, शेती हंगाम, बियाणे, उत्पादन, बाजारपेठ, पाणीपुरवठा, नद्यांचे व्यवस्थापन, जलप्रदूषण, धरणातील विसर्ग व या साऱ्याचा हवामानशास्त्राशी सांगड घालून केलेले निर्णय याकडे कोणाचेही लक्ष नाही. यंदा 98 टक्के पाऊस, यंदा पावसाळा सर्वसाधारण असे अंदाज वर्तवल्याने धरणे मोकळी झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांची तातडीने बैठक घेऊन संभाव्य पाणीबाणीवर चर्चा केली पाहिजे. तूर्त मान्सूनचे ढग घोंगावत नसल्याने पाणीबाणीचे संकट घोंगावते आहे.