शिवसेना या राजकीय पक्षाच्या आयुष्याला संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. त्यात ताऊन, सुलाखून शिवसेना नेटाने वाटचाल करत होती. मात्र आताची परिस्थिती अगदीच विपरीत आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही सोपवले आहे. त्यामुळे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची पुन्हा मोठी अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. तसे संकेतही येत होते. 19 जून स्थापना दिनाच्या दुसऱयाच दिवशी ठिणगी पडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. भाजपच्या साथीने मोठी पडझड घडवून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तरीही जनमानसातून ठाकरे यांना मिळत गेलेले समर्थन त्यांचे आव्हान टिकवणारे ठरले. ठाकरे आडनाव, शिवसेना भवन, मातोश्री बंगला, शिवाजी पार्कचा मेळावा, शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने असलेले शिवसैनिक याच्या जोडीला वक्तृत्व शैली ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू होती. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि सर्वसामान्यांमध्ये आपला माणूस अशी निर्माण झालेली प्रतिमा हे उद्धव ठाकरे यांचे वैशिष्टय़ तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी पक्षाचे बहुतांश आमदार आणि खासदार, सोबत महाशक्ती ही जमेची बाजू होती. त्यांचे वक्तृत्व ही त्यांची कमजोरी तर संघटन कौशल्य आणि साम-दाम-दंड-भेद नीतीने लोकांना जोडून ठेवण्याची किमया हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. आता शिवसेना भाजपबरोबर अधिकृत सत्ताधारी पक्ष बनला. तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अधिक अधांतरी बनला आहे. पुणे जिह्यातील पोट निवडणुकीनंतर त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नावासह मशाल चिन्हासाठीही लढाई करावी लागेल. याशिवाय शिवसेना भवन, बाळासाहेबांनी पक्षकार्यासाठी राखलेला मातोश्रीचा पहिला मजला हे सगळे टिकवण्यासाठी लढाई करून उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत या सर्वांना सामोरे जायचे आहे. अर्थात निर्णयाला न्यायालयात आव्हान देणे आणि स्थगिती मिळवणे शक्मय आहे. मात्र ते न्यायालय कसे समजून घेते यावर असेल. शिवसेना गीतात …. ‘धगधगता अग्नी चहुकडे आणि मार्ग निखाऱयाचा’ असे सेनेचे वर्णन आहे. उद्धव ठाकरेंच्या पायाखाली आणखीन निखारे टाकण्याचे काम आयोगाच्या निकालाने झाले तर शिंदे यांच्यासाठी त्यांच्या भूमिकेला मान्यता मिळण्याबरोबरच पुढच्या कुरघोडीला आधार मिळाला आहे. मात्र यातून उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व संपणार आहे का? उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याशी धनुष्यबाणाविरुध्द झुंजवणे भाजपला हिताचे वाटते. मात्र तो विचार निवडणुकीपर्यंत टिकाव धरु शकणे मुश्कील आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांनी महाराष्ट्रात सध्या वातावरण निर्मिती केली आहे. त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद असून तो वाढतच राहील. एका बाजूला त्यांची हिंदुत्ववादी मते कमी होतील असे म्हटले जाते. मात्र त्याचवेळी भाजपशी युती करण्याच्या आणि जपण्याच्या नादात बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तुटलेला प्रबोधनकार ठाकरे यांचा मराठा, ओबीसी, इतर बहुजन समाज, दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना जोडणारा धागा उद्धव ठाकरे यांच्या या संघर्षाच्या कारकिर्दीत जोडला जात आहे. पूर्वी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी महानगरपालिकांची गावे म्हणजे शिवसेनेची ठाणी असे म्हटले जायचे. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ग्रामीण महाराष्ट्रात पसरायला आणि फोफावायला लागेल. भाजपबरोबर युतीत असताना ग्रामीण अनेक भागांकडे, प्रश्नांकडे आणि जातीसमूहांकडे शिवसेनेने अक्षम्य दुर्लक्ष केले. तरीसुद्धा वऱहाडात, मराठवाडय़ात, कोकणात शिवसेनेने यश मिळवले. आधीच त्यांनी आपली भूमिका अधिक व्यापक केली असती तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिह्यात अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिनिधित्व मिळाले असते. मात्र त्या काळाशी सुसंगत भूमिका घेणे आणि भाजपची शतप्रतिशतची वाटचाल बाळासाहेबांच्या नंतर गती घेईल हे लक्षात घेऊन आधीपासून अधिक आक्रमक होणे आवश्यक होते. मात्र त्या काळात नेमके राणे, राज ठाकरे यांचे आव्हान पेलत उध्दव ठाकरेंनी वाटचाल केली. तेव्हाही काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग मुंबईत उतरले होते, तरीही उद्धव ठाकरे यांनी यश खेचून आणले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजप, मोदी लाट असताना स्वतंत्र निवडणूक लढून त्यांनी चांगले यश मिळवले होते. आताच्या लढाईत त्यांना एकाच वेळी स्वपक्षीयांसह स्वतःच्या चिन्हाशीही लढायचे आहे. सर्वोच्च न्यायालयात या सर्वावर मात करणे ही त्यांची आता प्राथमिकता आहे. अशावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दोष दिला किंवा भाजपने आपली शक्ती वापरली हे म्हणणे त्यांची बाजू म्हणून योग्य असली तरी शिवसेनेप्रमाणेच अनेक बाबतीत भाजपशी जवळ जाणारी भूमिका असणारा आम आदमी पक्ष अशा सर्व प्रयत्नानंतर सुद्धा फुटत नाही. कदाचित त्यांची कारकीर्द छोटी असल्याने अद्याप त्यात दोष आले नसतील. पण आपण 19 जून 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापने दिवशी होतो तशा भूमिकेत आहोत असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असेल तर पक्षात आलेले व्यंग, दोष दूर करण्यासाठी सुद्धा त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. पक्ष आणि चिन्ह नसताना त्यांच्यासोबत गर्दी दिसत आहे. मातोश्रीबाहेर खुल्या गाडीत उभे राहून भाषण करून त्यांनी इरादा सांगितला. न्यायालयांचे निकाल काय येतात आणि शहरी व ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. जनतेच्या न्यायालयातच या संघर्षाचा सोक्षमोक्ष लागेल. तोपर्यंत अधिकच्या निखाऱयावरूनच वाटचाल अटळ आहे.
Previous Articleजुन्या पेन्शन योजनेसाठी हरियाणात आंदोलनास्त्र
Next Article जगातील सर्वात एकाकी घर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.