ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राजेश टोपे तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामे करायची असतील तर लवकर करून घ्या. आम्ही आणखी 2-3 दिवस विरोधी पक्षात आहे, असे सूचक विधान केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, जालना जिल्ह्यात आणखी काही कामं करायची असतील, तर करुन घ्या. कारण आम्ही आणखी 2-3 दिवसच विरोधी पक्षात आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला जनतेने बहुमत दिले. प्रचारात मोदी-शाह व्यासपीठावर बोलले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. तेव्हा शिवसेना काहीही बोलली नाही. पण जेव्हा निकालानंतर असंगाशी संगत करुन महाविकास आघाडी सरकार बनवले.
राष्ट्रवादीला निधी मिळत होता, काँग्रेसला मिळत होता पण शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्री आमदारांना भेटत नव्हते. त्यामुळे सेनेत असंतोष वाढला आणि आमदारांनी बंड केले. भाजपचा यात कोणताही रोल नाही. शिंदे गटाने आम्हाला प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यानंतर शिंदे गटाशी युती करायची की नाही, हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही दानवे म्हणाले.