संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांचे प्रतिपादन : येळ्ळूर येथील 18 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
बेळगाव : समाजामध्ये दुही माजवून आपला राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतो. वैदिक परंपरेने समाजामध्ये दोन गट पाडत आपले सांस्कृतिक वर्चस्व निर्माण केले गेले. भाषा, कला, साहित्यावर आक्रमण होत असून हे थांबविण्यासाठी लेखक व साहित्यिकांनी ठोस भूमिका मांडणे गरजेचे आहे. अन्यथा याचे परिणाम भविष्यात भयंकर होतील, अशी चिंता पुणे येथील साहित्यिक व संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी व्यक्त केली. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या 18 व्या संमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा समाजातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, संमेलने ही समाजाला ऊर्जा व दिशा देऊ शकतात. विशेषत: ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांतून पुरोगामी विचार तळागाळात पोहोचविले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर शाहू, फुले, आंबेडकर यांचा अभ्यास करावा लागेल. बहुजन हिंदूंनी आता एकत्र येण्याची खरी गरज आहे. कारण, बहुजन समाजाला भूमिकाच नसल्याने ते इतरत्र भरकटत आहेत. चांगले कपडे, चप्पल घातले म्हणजे आपण आधुनिक होत नाही, तर विचारांमध्ये आधुनिकता आणावी लागणार आहे. जातव्यवस्था बाजूला सारून आपणाला आधुनिक होता येते. गौतम बुद्ध हे सर्वात पहिले आधुनिक म्हणता येतील. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत:चे अस्तित्व निर्माण करा, असा सल्ला डॉ. मिलिंद कसबे यांनी दिला.
स्वागताध्यक्ष ता. पं. माजी सदस्य रावजी पाटील यांनी स्वागत केले. संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी ठरावांचे वाचन केले. उद्घाटक अॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, बेळगावमधील साहित्य संमेलने महाराष्ट्रापेक्षाही मोठी असतात. लढवय्या गाव म्हणून येळ्ळूरची ओळख संपूर्ण देशात आहे. सीमालढ्यासोबतच साराबंदीच्या लढ्यात येळ्ळूरने आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार असल्याने मराठीच्या संवर्धनासाठी काम करणे गरजेचे आहे. एखाद्या मोठ्या लढ्यामागे साहित्यिकांची व साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याने सीमाभागात दर्जेदार साहित्यिक तयार व्हावेत, ही या संमेलनांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कारांचे वितरण
साहित्य संघातर्फे दरवर्षी साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यावर्षी प्रा. डॉ. रोहिदास जाधव, श्रीमाता सोसायटीचे संस्थापक मनोहर देसाई, साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे, लेखिका राजश्री पाटील, क्रीडा शिक्षक प्रदीप जुवेकर, शेतकरी परशराम पाटील, सैनिक सोसायटीचे चेअरमन बाबुराव मुरकुटे, हेस्कॉम कर्मचारी यल्लाप्पा गौंडवाडकर, हस्तचित्रकार जयपाल पुजारी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आलेल्या वावटळीलाही येळ्ळूरकरांचे एकजुटीने उत्तर
संमेलनस्थळी अध्यक्षांचे भाषण सुरू असतानाच मोठी वावटळ आली. वावटळ जोराने आल्याने मंडपासाठी लावण्यात आलेले बांबू वाऱ्याच्या झोताने उखडू लागले. मंडप उडून जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच संमेलनातील मान्यवरांसोबतच येळ्ळूर ग्रामस्थांनी खांब घट्ट पकडून ठेवले. यामुळे काही काळातच पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्षांनी येळ्ळूरकरांचे कौतुक करत अशा अनेक वावटळींना येळ्ळूरच्या नागरिकांनी तोडीस तोड उत्तर दिले असल्याचे नमूद केले.
इतिहास-शिवकाळ युवकांना प्रेरणादायी
छत्रपती शिवाजी महाराजांनी बालमावळ्यांसह हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याला संत तुकाराम, शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांचा इतिहास आहे. हा इतिहास आणि शिवकाळ युवकांना प्रेरणादायी आहे. विविध जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य उभे केले, असे विचार पुणे येथील प्रा. डॉ. औदुंबर लोंढे यांनी मांडले. ते ‘ढाल-तलवारीपलीकडचे छत्रपती शिवराय’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, शिवरायांनी रयतेवरील अन्याय दूर करून लोकशाही आणली. शेतकऱ्यांच्या भूभागाची मोजणी करून प्रतवारी केली, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविली. वतनदारी मोडीत काढून शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठालाही हात लावू नये, असा आदेश दिला. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन रयतेचे राज्य शिवरायांनी आणले, असे सांगत तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी या मावळ्यांचे प्रसंग रसिकांसमोर ठेवले.
भावस्पर्शी कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी सामाजिक आणि कौटुंबिक कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘माय तान्हा लेकराला’, ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माजी माय’, ‘एका माय-बापामध्ये पैज अशी लागली’ अशा कविता सादर केल्या. आई विषयावर कितीही लिहिले, बोलले तरी आई म्हणजे जीवनाला वाट व आयुष्याला नवी पहाट असल्याचे सांगून आईचा भाव व्यक्त केला. ऐका ऐका दोस्तांनो आई-बापाची कहाणी यासारख्या भावस्पर्शी कविता सादर केल्या. ‘जीव लावतीय माय जन मायेचं निराळं’ अशा कौटुंबिक रचना सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. कोकणी भाषेतही कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. कै. प्रा. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे स्मृती स्पर्धेतील विजेत्यांचे कथाकथन सादर झाले. तिसऱ्या सत्रात समृद्धी पाटील हिने ‘बे दुणे किती’ ही गुरुजींची व्यथा मांडणारी आणि शिक्षण व्यवस्थेची व्यथा सांगणारी कथा सादर केली. अनुजा लोहार हिने नरवीर तानाजी मालुसरे यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ हा प्रसंग मांडला. स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचे धाडस व शौर्य दाखवून दिले. सीमाभागात मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. येळ्ळूर केंद्रात प्रथम त्याचबरोबर विविध विषयांमध्ये अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
ग्रंथदिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतीची परंपरा लाभलेल्या येळ्ळूर गावाने साहित्य संमेलनातही आपली परंपरा जपली. ग्रंथदिंडीवेळी सजविलेल्या बैलगाडीत विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती असे रूप पाहायला मिळाले. टाळ-मृदंगाच्या गजरात व ढोल-ताशांच्या निनादात काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे, माजी महापौर सरिता पाटील, मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर, उद्योजक अमर अकणोजी, अॅड. रतन मासेकर, सीए संदीप खन्नुकर, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचा उद्घाटन सोहळा पार पडला. गावच्या वेशीतील महाराष्ट्र हायस्कूलपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. तुरमुरी येथील शिवदैवत ढोलताशा पथकाने अंगावर शहारे आणणारे ढोलवादन केले. वडगाव येथील वारकरी मंडळींकडून भजन केले जात होते. गावातील पतसंस्था, हायस्कूल्स यांच्यावतीने ठिकठिकाणी ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. संमेलननगरीचे उद्घाटन उद्योजक विजय धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन प्रकाश पाटील, बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन अरुण सुळगेकर, दिवंगत लक्ष्मणराव मेलगे प्रवेशद्वाराचे उद्घाटन तानाजी हलगेकर, दिवंगत प्रा. रामभाऊ कुट्रे ग्रंथदालनाचे उद्घाटन महेश जुवेकर, दिवंगत कामगार नेते राम आपटे सभामंडपाचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले, स्वामी विवेकानंद विचार पीठचे उद्घाटन परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन सीए संदीप खन्नुकर, सरस्वती प्रतिमा पूजन श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन सरिता पाटील, तुकाराम प्रतिमा पूजन दुदाप्पा बागेवाडी, गुरुवर्य गावडोजी पाटील प्रतिमा पूजन शिवाजी सायनेकर, राष्ट्रवीरकार शामराव देसाई प्रतिमा पूजन रामा पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर यल्लोजीराव मेणसे, अर्जुन गोरल, शांताराम कुगजी, अरुण सुळगेकर, लक्ष्मी मासेकर, रुक्मिणी नाईक, रघुनाथ मुरकुटे, प्रकाश पाटील, जोतिबा काळसेकर, सतीश पाटील, राजकुमार पाटील, मल्लाप्पा कुंडेकर, दीपक कर्लेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘गांधी’ चित्रपट ठरला माईलस्टोन!
प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी उलगडले अभिनयाचे कंगोरे
चित्रपटसृष्टी ही तशी मला नवीनच होती. प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना चित्रपटांमध्ये लहान भूमिका मिळत गेल्या. या दरम्यान, ‘गांधी’सारखा एक मोठा चित्रपट करण्याची संधी योगायोगाने माझ्याकडे आली. त्यावेळी माझ्याकडे पासपोर्टही नव्हता. जवळच्या मैत्रीमुळे अवघ्या आठ दिवसात पासपोर्ट काढून ‘गांधी’ चित्रपटासाठी संधी मिळाली. या चित्रपटात नासिरुद्दीन शाह, स्मिता पाटील, भक्ती बर्वे अशा मोठ्या व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट माझ्या आयुष्यातील माईलस्टोन ठरला, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या मुलाखतीत दिली.
18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध पैलू उलगडून दाखविले. प्रा. मनीषा नेसरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. रोहिणी हट्टंगडी पुढे म्हणाल्या, लहान वयापासूनच कला क्षेत्राची आवड असल्यामुळे कथ्थकली व भरतनाट्यामचे शिक्षण घेतले. ‘मंतरलेले पाणी’ या बालनाट्यातून नाट्याक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतरचे शिक्षण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पूर्ण केले. या दरम्यान पती जयदेव हट्टंगडी यांची ओळख झाल्याचे त्यांनी सांगितले.
अमिताभ हे न समजणारे रसायन
अमिताभ बच्चन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नाव होय. त्यांच्यासोबत ‘शहेनशहा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर ‘अग्निपथ’ चित्रपटात त्यांच्यासोबत उत्तम काम केले. एखाद्या चित्रपटात भूमिका लहान असली तरी तिला न्याय कसा द्यावा, हे अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. इतका मोठा कलाकार परंतु कुठलाच बडेजाव नाही. त्यामुळे त्यांच्याकडून हा गुण आयुष्यभर अंगिकारला आहे. मराठीसोबतच गुजराती, कन्नड, तमिळ चित्रपटांमध्येसुद्धा काम करण्याची संधी मिळाली. ‘सूर्या’ या कानडी चित्रपटात केलेली भूमिका आजही आठवते.
‘चार दिवस सासूचे’मुळे घराघरात
‘चार दिवस सासू’चे या मालिकेमुळे रोहिणी हट्टंगडी हे नाव प्रत्येक मराठी घरात पोहोचले. सासूचे चार दिवस असले तरी ही मालिका मात्र तब्बल बारा वर्षे चालली. या मालिकेने एक कौटुंबिक नाते तयार केले. त्यामुळे आयुष्यात वाईट वेळ असतानाही या मालिकेतील कलाकारांनी सावरले. त्याचबरोबर ‘होणार सून मी या घरची’ ही मालिकाही चार वर्षे चालली. या दोन्ही मालिकांमुळे एक सोज्वळ सासू महाराष्ट्राला बघायला मिळत होती, असे त्यांनी सांगितले.