पुणे : पिवळ्या धम्मक पायवाटेवर सोनपावलांचे ठसे उमटवित संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी जेजुरीत दाखल झाली. यावेळी भांडारा आणि खोबऱ्याची उधळण करत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा गजर करण्यात आला.
सासवडमधील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. सासवडपासून दहा मैलांच्या अंतरावर खंडोबारायाची जेजुरी आहे. जेजुरीच्या दिशेने वारकरी चालू लागले. कऱ्हा नदीचा पूल ओलांडल्यानंतर बोरावके मळा येथे पालखीने पहिला विसावा घेतला. यमाई शिवरी येथे दुपारचे भोजन झाले. दुपारी पालखी पुन्हा वाटेला लागली. तसा वारकऱ्यांचा उत्साह दुणावला.
टाळ मृदंगाचा गजर, अभंगाचा नाद घुमू लागला. ऊन, सावलीचा खेळ सुरूच होता. सायंकाळच्या सुमारास पालखी मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत पोहोचली अन् जेजुरीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. भंडारा व खोबरे उधळून पालखी सोहळय़ाचे स्वागत करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार.. असा जयघोष झाला. त्यानंतर पालखी मुक्कामी विसावली. सोमवारी सकाळी सहा वाजता पालखी वाल्हे येथे मार्गस्थ होणार आहे.