भाजपचा प्रस्तावावर बहिष्कार :
वृत्तसंस्था/ कोलकाता
भाजपच्या विरोधादरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेने सोमवारी मणिपूरमधील हिंसेची निंदा करणारा एक प्रस्ताव संमत केला आहे. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात प्रस्ताव मांडला. प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाग्रस्त राज्यातील स्थिती हाताळण्यास भाजप अन् केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी मणिपूरसंबंधी वक्तव्य करायला हवे. पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जाऊ शकतात, परंतु मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत ही बाब लाजिरवाणी आहे. पंतप्रधान मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास असमर्थ असल्यास आम्हाला (विरोधी पक्षांची आघाडी) शांतता बहाल करण्याची अनुमती दिली जावी असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
संबंधित विषय न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने विधानसभेतील ही चर्चा अवैध आहे. मणिपूरवर चर्चेची अनुमती देण्याच्या या अवैध निर्णयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. हा प्रकार संघीय चौकटीच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संबोधनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
सभागृहात आम्ही आमचा विरोध नोंदविला असून बाहेरही निदर्शने करणार आहोत. मणिपूरचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. तृणमूल काँग्रेसने सभागृहात बेकायदेशीर कृत्य केले असून आमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे.