स्मार्ट सिटीचे मात्र अर्धवट कामांकडे दुर्लक्ष : वकील-नागरिकांतून तीव्र नाराजी
बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. मात्र काही ठिकाणी पूर्वी झालेल्या अर्धवट कामांकडे अजूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भुयारी मार्ग करण्यात आला. मात्र तो भुयारी मार्ग कुचकामी ठरला आहे. मात्र त्याबाबत कोणताच निर्णय स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आला नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग तसाच पडून राहणार की त्याबाबत निर्णय घेणार? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात न्यायालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी तब्बल सव्वाकोटी ऊपये खर्च करण्यात आले. पण आता हा भुयारी मार्ग केवळ शोभेची वस्तू बनला असून या ठिकाणी लावलेले ट्यूबलाईट्स चोरट्यांनी चोरून नेले आहेत. सध्या या भुयारी मार्गामधून कोणीही ये-जा करत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग एक अडगळीची वस्तू बनला आहे. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे वकिलांना तातडीने जाण्यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. न्यायालयाच्या या मुख्य रस्त्यावर नेहमीच मोठी रहदारी असते. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड बनत आहे. या ठिकाणी अपघातही घडले आहेत. त्यानंतर वकिलांनी भुयारी मार्गाची मागणी केली. यासाठी आंदोलनेही करण्यात आली. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला.
सध्या ज्या ठिकाणी भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणांऐवजी न्यायालयाच्या आवाराकडे हा भुयारी मार्ग हवा होता, अशी मागणी वकिलांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीत भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली. यासाठी तब्बल 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागला. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. वाहनचालकांना यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. साऱ्यांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला होता. मोठा खर्चही करण्यात आला. मात्र आता हा भुयारी मार्ग कुचकामी ठरला आहे. या भुयारी मार्गासाठी वकील मंडळींनी आंदोलन छेडले होते. पण हा भुयारी मार्ग तयार होऊन त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनताही या भुयारी मार्गातून जात नाही. यामुळे सरकारचा निधी वाया गेला आहे. स्मार्ट सिटीचे काम करताना त्याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र त्याकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. सध्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विकासकामांचे उद्घाटन केले. आता आवारातून रस्ता होत आहे. मात्र भुयारी मार्गाचे काय? याबाबत त्यांनीही अद्याप काहीच निर्णय घेतला नाही.
भुयारी मार्गाचा दुऊपयोग
या भुयारी मार्गात फरशी बसविण्यात आली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बाजुने गटारी काढून त्यावर लोखंडी झालर बसविण्यात आली होती. अंधारात ये-जा करणाऱ्यांसाठी तब्बल 10 ट्यूबलाईट्स बसविण्यात आले होते. भुयारी मार्ग आकर्षित दिसावा यासाठी स्टीलचे किमती पाईपही बसविण्यात आले आहेत. चांगल्याप्रकारे या भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली. पण यामधून दिवसाकाठी एक वकीलही या भुयारी मार्गाचा वापर करत नाही. सध्या या भुयारात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्टार, तंबाखू तसेच सिगारेट यांची पाकिटे पडली आहेत. एकूणच या भुयारी मार्गाचा दुऊपयोग चालल्याचे दिसून येत आहे.