बेळगाव : शहरात पाणी समस्या गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे जलवाहिनींना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरात विविध ठिकाणी पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. याबाबत एलअॅण्डटी कंपनी मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून गुडस्शेड रोडवर जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. एकीकडे पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे मात्र विनाकारण पाणी वाया जाऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. गळती लागलेल्या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे शहरात आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. दरम्यान तीस टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. अशी गंभीर परिस्थिती असली तरी विविध ठिकाणी गळती लागून पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहरात दररोज जलवाहिनीला गळती, जलवाहिनी फुटणे, व्हॅल्व्हला गळती आदी कारणांमुळे पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. दरम्यान विकासकामांच्या खोदाईवेळी पाईपलाईन फुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पाणी वाया जाऊ लागले आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांची लाहीलाही होऊ लागली आहे. तर अशातच पाणी विनाकारण वाया जाऊ लागल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. एलअॅण्डटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याचे काम सोपविण्यात आल्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यातच जलवाहिनीच्या नादुरुस्तीचे प्रकार वाढल्याने एलअॅण्डटी कंपनीच्या डोकेदुखीत भर पडली आहे. शहरातील नादुरुस्त व्हॉल्व्ह आणि जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.